अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मांडल्या भावना : कोल्हापूर पुरोगामी विचाराचेच राहणार असल्याचे केले स्पष्ट
संजीव खाडे, कोल्हापूर
Shrimant Shahu Maharaj Interview : महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर कोल्हापूरला मंत्रिपद मिळण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.त्याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासावर आणि राज्याच्या राजकारणातील प्रभावावर देखील झाला.त्यामुळे आता गतीने विकास साधायचा असेल तर राज्यात प्रभावी ठरेल,असे नेतृत्व कोल्हापुरातून तयार होण्याची गरज आहे. कोल्हापूरनेच भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा श्रीमंत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केली.
आज शनिवारी 7 जानेवारीला श्रीमंत शाहू छत्रपती 75 व्या वर्षांत पदार्पण करत आहेत.अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांनी ‘तरुण भारत संवाद’ला दिलेल्या मुलाखतीत आपली मते परखडपणे मांडले.सामाजिक,राजकीय स्थितीबरोबरच कोल्हापूरच्या विकासावरही भाष्य केले.
देशातील जनता लोकशाहीला धक्का लावू देणार नाही
आपला देशही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहेत.देशाची वाटचाल आणि सद्यःस्थितीकडे आपण कसे पाहता? या प्रश्नावर शाहू छत्रपती म्हणाले,विकासाच्या वाटेवरून पुढे जाताना आपल्या देशाने काळानुरूप बदल स्वीकारले.राज्यघटनेतही दुरुस्त्या झाल्या.पण आता मुलभूत अधिकारावरच गदा येईल की काय? अशी स्थिती आहे. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांमुळे लोकशाही जीवंत आहे.तिला धक्का देता येणार नाही,आपल्या देशातील जनता देखील तसे होऊ देणार नाही.
कोल्हापुरातून राज्यव्यापी लीडरशीप तयार व्हावी
सांगली, सातारा, पुणे, मुंबई, कोकण आणि विदर्भातून राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे नेतृत्व तयार झाले.तसे कोल्हापुरातून का होऊ शकले नाही? या प्रश्नावर शाहू छत्रपती म्हणाले, मुळात महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर कोल्हापूरला राज्यमंत्रिमंडळात संधी मिळण्यासाठी प्रदीर्घ काळ जावा लागला.या काळात स्थानिक नेते आणि त्यांचे नेतृत्व बहरू शकले नाही. पुढे रत्नाप्पाण्णा कुंभार, उदयसिंगराव गायकवाड यांच्या रूपाने मंत्रीपद लाभले. पुढच्या काळात इतरही नेत्यांना मंत्रीपदे लाभली.पण यातून राज्याच्या राजकारणावर प्रभाव पाडू शकेल,असे नेतृत्व,नेता तयार होऊ शकला नाही.सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यातील राज्यांला मुख्यमंत्री दिले.इतर बडे मंत्रीही या जिल्ह्यातून आले. त्यांच्या मंत्रिपदाच्या ताकदीचा लाभ राज्याबरोबर त्यांच्या जिल्ह्यांनाही झाला.त्यांचा विकास गतीने झाला.दुर्दैवाने ही गोष्ट कोल्हापूरबाबत घडू शकली नाही.आता कोल्हापूरने स्वतःबरोबर राज्याचा विकास करण्यासाठी सर्वव्यापी लीडरशीप, नेतृत्व तयार करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राजकीय मांडणी आवश्यक आहे.
कोल्हापूरच्या विकासासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज
कोल्हापूरच्या उच्च शिक्षित मुलांना पुणे, मुंबई, बेंगळूरला जावे लागत आहेत. विकासात आपण कुठे तरी मागे पडलोय असे वाटत नाही काय? या प्रश्नावर शाहू छत्रपती म्हणाले,आयटी असो वा सर्व्हिस इंडस्ट्रिज असो,यातील प्रकल्प आपल्याकडे आले पाहिजे, हे जरी खरे असले तरी त्यासाठी राजकीय ताकद इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. ती आपल्या नेतृत्वाकडे दिसत नाही. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीने विकासाला चालना मिळणार असली तरी ते पूर्ण सत्य नाही. विकासातील इतर गोष्टींवरही आपल्या लक्ष द्यावे लागेल.
कोल्हापूर पुरोगामी आहे पुरोगामीच राहिल
राजर्षी शाहू महाराजांची कोल्हापूर नगरी पुरोगामीत्वाकडून हिंदुत्वाकडे वळू लागली आहे.जनाक्रोश मोर्चानंतर तशी चर्चा सुरू झाली आहे, याविषयी काय सांगाल? या प्रश्नावर शाहू छत्रपती म्हणाले,पुरोगामी विचार म्हणजे काय? पुढचा,भविष्याचा विचार करून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा विचार.लोकशाहीत विचार मांडण्याचा सर्वांना हक्क आणि अधिकार आहे.काहीवेळा काहीजण कृत्रिमरित्या काही प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न करतात.ती गोष्ट सत्य नसते.कोल्हापूरमध्ये संस्थानकाळापासून सामाजिक सलोखा,एकोपा आहे.त्यामुळे कोल्हापूर पुरोगामीच राहणार.
मराठा आरक्षण केवळ पंतप्रधान मोदीच देवू शकतात
मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रीमंत शाहू छत्रपतीची भूमिका आणि योगदान महत्वाचे राहिले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक, त्यात त्यांचा सहभागही राहिला आहे. आंदोलने करून मोर्चे काढून अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. या प्रश्नावर श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, भाजपला केंद्रात मोठे बहुमत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वादातीत नेते आहेत. त्यामुळे संसदेत आवश्यक तो कायदा करून मराठा समाजाला आरक्षण केवळ पंतप्रधान मोदीच देवू शकतात. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी त्यांना भेटून मराठा आरक्षणाचा आग्रह धरला पाहिजे.
श्रीमंत शाहू महाराज म्हणतात….
-छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून स्वराज्य निर्मिती केली.
-राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जोपासणे अवघड,कठिण काम.
-काळानुरूप बदल करत पुरोगामी विचार पुढे नेण्याचा माझ्याकडून प्रयत्न.
-महापुरूषांविषयी भाष्य करताना सर्वांनी सामाजिक भान ठेवणे आवश्यक.
-राज्यातील जनता समाधानी आहे यापेक्षा राज्यकर्ते समाधानी आहे काय हे तपासावे लागेल.
संदेश : सलोखा राखा,आदर करा,सन्मान ठेवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्या महाराष्ट्रात सामाजिक सलोखा आहे.राजर्षी शाहूंच्या काळापासून तो कोल्हापूरनेही जपला आहे.यापुढे सामाजिक सलोखा राखताना सर्वांनी एकमेकांचा आदर करत,सन्मान ठेवत राहायला हवे,असा संदेश श्रीमंत शाहू छत्रपती यांनी तमाम करवीरवासीयांना दिला.