प्रशासन व प्रकल्पधारकांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा स्थानिकांचा इशारा
आचरा/ प्रतिनिधी-
आचरा पारवाडी-डोंगरेवाडी येथील वादग्रस्त कोळंबी प्रकल्पाबाबत १५जुलै२०२१ला झालेल्या शासन आदेशाची प्रकल्प धारकाकडून अकरा महिने उलटूनही कोणतीही पुर्तता केलेली नाही. यामुळे या वर्षीही पारवाडी भागात पुरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनही बघ्याची भूमिका घेत असून प्रशासन शेकडो ग्रामस्थांच्या हितासाठी आहे की एकट्या प्रकल्प धारकासाठी असा सवाल विचारत प्रशासनाने याची तातडीने दखल घेत ग्रामस्थांच्या हिताचा निर्णय न घेतल्यास प्रशासन आणि प्रकल्प धारकाच्या विरोधात आक्रमक पवित्र्यात रस्त्यावर उतरण्याचा इशारा पारवाडी डोंगरेवाडी ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
आचरा पारवाडी डोंगरेवाडी ग्रामस्थांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानूसार दिनांक १५जुलै२०२१ ला मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्रकल्प धारकाला दिलेल्या आदेशानुसार खाडीचे पाणी निचरा होण्यासाठी सध्या असलेल्या कालव्याच्या रुंदीपेक्षा आणखीन चाळीस फूट रुंदी वाढविण्यासह बांधावरील कुंपण काढून टाकावे जेणेकरून ग्रामस्थांना जाणे येणे शक्य होईल. सदर आदेशाची पुर्तता सात दिवसाच्या आत करण्यास सांगितले होते. मात्र अजूनही याची पुर्तता झाली नसल्याने प्रशासनानेही आजपर्यंत कुठलीही कारवाई सदर प्रकल्प धारकावर केलेली नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. येथील शेतकरी गेल्या वर्षी नुकसान झाल्याने या वर्षी शेती करण्यास इच्छुक नसल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. यावर्षी प्रादेशिक बंदरविभागाच्या इशारयानुसार २६वेळा समुद्राला मोठे उधाण येणार आहे. यामुळे याभागाला या प्रकल्पामुळे मोठा धोका संभवतो. प्रशासनाचे आदेश धुडकावून प्रकल्प मालक निर्धास्त आहे. त्यामुळे याबाबत तातडीने लक्ष देवून प्रशासनाकडून दखल घेतली न गेल्यास प्रशासन आणि प्रकल्प धारकाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा पारवाडी डोंगरेवाडी ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.