‘मनु..अगं केवळ पती पत्नीच्या नात्यातच नाही तर सर्वच नात्यांमध्ये तडजोड आलीच बाळा! मला सांग..दोन व्यक्ती त्यांचे दिसणे, स्वभाव, दृष्टिकोन हे शंभर टक्के जुळेल का? तुझं आणि तुझ्या डॅडीचं, तुझं आणि माझं, तुझं आणि रितेशचं शंभर टक्के पटतं का? आपण अगदी एका घरात राहतो, नात्याने घट्ट बांधले गेलो आहोत पण तरीही कधीतरी आपल्यामध्ये वादविवाद, मतमतांतरे होतातच ना गं? कायमच सुरात सूर मिसळला असं नाही ना होत? काहीवेळा वाद झाला तर तू शांत राहतेस, काहीवेळा दादा शांत राहतो. काहीवेळा बाबा तर कधी मी..कधी ना कधीतरी आपण तडजोड करतच असतो ना?’
‘अगं हो मम्मा..पण तरीही..लग्न म्हणजे टेन्शनच येतं. जमलं तर ठीक नाहीतर कोर्टाच्या फेऱया मारा..’
‘हे बघ मनु..तडजोड या शब्दाला तू घाबरत असशील तर ती भीती मनातून काढून टाक..अगं ऍडजेस्टमेंट कुणाला करावी लागत नाही सांग बरं? नोकरीमध्ये, घरात, मित्र परिवारात सगळीकडे आपण जुळवून घेतच असतो की गं..कधी आपण जुळवून घेतो तर कधी समोरचे जुळवून घेतात. आपण स्वतः तरी शंभर टक्के कुठे बरोबर असतो? काही कमतरता असतातच ना?’
‘हो मम्मा..पटतंय मला. तडजोड हा मुद्दा नाही. पण वेगळय़ा माणसात जायचं, तिथे रुळायचं हे कठीण आहे. ऑफिसमधलं काम, दगदग.. घरी येऊन दमछाक, घरची कामं ही सारी कसरत तुझ्यासारखी मला नाही जमणार.
ऑफिसमध्ये कर्मचारी, घरी आल्यावर मुलगी, आदर्श सून, आई, पत्नी, कुणाची तरी काकी-मामी, आत्या-बहीण, वहिनी या सगळय़ा भूमिका आणि इतरांना हवा तसा त्या भूमिकेला न्याय देणं मला नाही जमणार. तुला मी स्वार्थी आहे असं वाटेल पण तुमच्या ‘डबल डय़ुटी’मध्ये जी दमणूक होते ना..ती मी पाहिलीय जवळून..हे बघ मम्मा..मी हे लग्न ठरवताना स्पष्ट बोलले तर तू म्हणणार..अगं आधी त्या घरी तरी जा..आताच असं बोललीस तर तो आगाऊपणा वाटेल. तू मला तेवढं स्पष्ट बोलूही देणार नाहीस. पण काही गोष्टी मोकळेपणाने बोलायला हव्यात गं. मला कोणती जबाबदारी घ्यायची नाही वा नकोय असंही नाही. पण ‘लग्न’ वगैरे तसं सोप्पं नसतंच..’
‘बघू..मी लग्न करणारच नाहीये असं म्हणत नाही. पण समजून घेणारा पार्टनर हवा. वेळ आहे अजून.. आता घाई नको..थोडा वेळ दे मला प्लीज’ असं म्हणत मनु ऑफिसला निघून गेली. ‘काय करायचं या पोरांचं वय नाही का वाढत’ असं पुटपटत मालनताईही शांत राहिली.
त्या दिवशी लायब्ररीमध्ये आलेला मनोज पुस्तके अक्षरशः धुंडाळत होता. चार पाच पुस्तके काढली परत ठेवली हे असेच काहीसे सुरू होते. शेवटी तिथल्या एका नेहमी येणाऱया स्मार्ट गृहस्थांनी त्याला विचारले, ‘अरे काय शोधतोयस एवढं..’ मनोज म्हणाला, ‘काका..विवाह यशस्वी होण्यासाठी काही टिप्स असलेले पुस्तक शोधतो आहे. तीन चार पुस्तके पाहिली पण त्यात कॉमन मुद्देच आहेत.’
काका हसून म्हणाले, ‘अरे बाळा नुसते पुस्तक वाचून काय होणार. वैवाहिक यशाचे असे रेडिमेड फॉर्म्युले अस्तित्वात नाहीत. त्यासाठी विवाहसंस्थेत प्रवेश करुनच तो यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. काय रे हल्लीची मुलं तुम्ही…विवाह हे बंधन वाटतं म्हणून धास्तावता. होय ना? अरे कधी सुखाचे सरळ रस्ते आणि कधी वेदनेच्या, कधी खडकाळ कधी चकवा देणाऱया पायवाटा..परस्परांचा हात धरून सहजीवनाचा प्रारंभ करणाऱया प्रत्येक जोडप्याचा प्रवास हा असाच होतो बाळा!!
विचार कर ना.. शतकानुशतके चालत आलेली ही व्यवस्था अशीच असेल का रे?’
अंगावर पडलेले झुरळ झटकावे तसा लग्न हा विषय झटकणारी ही मुलं पाहतो आणि आजही अनेक तरुण जोडपी लग्न चांगलं निभावत आहेत असंही पाहतो. दृष्टिकोनाचा खेळ आहे सगळा. तुमच्या पिढीची गंमत अशी आहे लेका की लग्नाविना जगणंही मुश्कील आणि त्याच्यासह जगायचं तरी कसरतीचं वाटतं तुम्हाला..हो ना? शतकानुशतके चालत आलेली ही व्यवस्था आहे, अनेकांना ती नकोशी वाटत असेल, वाटतेही, पण मला सांग इतकं होऊनसुद्धा अजून लग्नसंस्थेला अधिक चांगला, कालोचित आणि सर्वसामान्य पर्याय का सापडत नाही?’
‘ही वाट जरा कठीण आहे पण मी ती निश्चित चालून पाहिन आणि यशस्वी होईन असं ठरवायचं आणि सारासार विचार करून पाऊल टाकायचं. हमखास यशस्वी लग्नाचे आयते फॉर्म्युले शोधायला जाशील तर हाती काहीच लागणार नाही.. गोंधळ अधिक वाढेल. लग्न आपोआप यशस्वी होत नाही. ते यशस्वी करावं लागतं.. अभ्यासात, नोकरीत जशी मेहनत घेता ना..तशीच नात्याच्या संगोपनासाठीही घ्यावी लागते. इथे भावनिक आणि मानसिक आधार ही त्यातून मिळणारी मोठ्ठी ऍसेट असते. ही ऍसेट हवी असेल तर थोडी लवचीकतेची, तडजोडीची, मायेची गुंतवणूक करावी लागणारच ना?’
‘हो…हो..आलं लक्षात’ असं म्हणत मनोजने सगळी पुस्तके ठेवून दिली आणि तो निघून गेला.
अनेक तरुण मुलामुलींचे प्रतिनिधित्व करणारी वरील उदाहरणातील मनु काय किंवा मनोज काय असे अनेक किस्से समोर येतात. असंख्य प्रश्न मनात ठेवून भेटायला येणारी तरुण मुलं मुली, काहीवेळा लग्न नकोच म्हणतात, काय करावे कळत नाही अशी समस्या घेऊन येणारे पालकही भेटत असतात. मनात असलेल्या वेगवेगळय़ा संकल्पना आणि वैचारिक गोंधळ यात अडकलेले तरुण तरुणी समोर येतात. लग्न नकोच आहे असेही नसते आणि वचनबद्धता, बांधीलकी, कुणाला ऍन्सरेबल असणे वगैरे शब्दांची धास्ती असते. मग काहीवेळा वरवर हे नातं झिडकारण्याकडे कल असतो परंतु वरच्या उदाहरणातील मनोजसारखे ‘हमखास यशस्वी विवाहाचे’ काही फॉर्म्युले सापडतात का याचीही चाचपणी सुरू असते. असे रेडिमेड यशस्वी होणारे फॉर्म्युले सापडत नाहीत आणि मग अधिक गोंधळ होतो.
खरंतर समजून घेणे आणि लवचीक असणे हे नात्यातले मुख्य सूत्र! केवळ वैवाहिक नात्याच्या बाबतीतच नाही जर कोणतेही नाते टिकवायचे असेल तर हे सूत्र सांभाळावेच लागते नाहीतर नात्याचे समीकरण गुंतागुंतीचे होण्यापलीकडे हाती काहीच लागत नाही. परंतु या सूत्रासोबतच विवाह यशस्वी व्हायचा असेल तर योग्य निवड आणि नाते जोपासण्यासाठी केलेले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे आहेत. लग्न जमवताना ‘जोडे झिजवावे लागतात’ अर्थात खूप परिश्रम घ्यावे लागतात हा समज आजही पक्का आहे. एकदाचे लग्न झाले की ‘हुश्श..सुटलो बुवा’ असे म्हणून चालणार नाही. बदलत्या संकल्पना, बदलता काळ, कालमानानुसार बदलणारी जीवनशैली या सर्वांमध्ये आताच्या काळातील लगीनगाठ तेवढी सोपी राहिली नाही. लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील आणि घ्यायलाही हवेत. जोडीदारासोबतचे नाते अधिकाधिक गहिरे होण्यासाठी दोघांनाही प्रयत्न करावे लागतील. लग्न करून एका नव्या नात्याची सुरुवात करणे म्हणजे दोन सुंदर रोपटी लावण्यासारखेच असते. पहा हं नवीन रोपटे लावल्यानंतर आपण ते नीट वाढावे, फुलावे यासाठी किती काळजी घेतो? त्यासाठी स्वच्छ, मोकळा प्रकाश, वेळच्या वेळी पाणी, रोपटय़ाला त्रासदायक ठरेल असे उगवणारे तण वेळीच काढून टाकणे, त्याला अधिक ऊन लागून त्याची पाने कोमेजून जाणार नाहीत याची काळजी घेणे हे करतोच ना? रोपटे लहान असताना, वा रोपटय़ाची मुळे घट्ट होईपर्यंत खूप काळजी घ्यावी लागते. नात्याचेही तसेच आहे.
नात्याचे रोपटे अगदी लहान असताना त्याची जेवढी काळजी घ्याल तेवढेच ते पुढे बहरेल, गैरसमजाचे तण वेळीच काढून टाकाल, आपुलकीचे, मायेचे सिंचन कराल तर ते नाते बहरेल, फुलेल आणि कुटुंब व्यवस्थेला सावली देणारे ठरेल हे मात्र निश्चित!!!
-ऍड. सुमेधा संजीव देसाई