शासकीय इतमामात ज्ञानयोगाश्रमात अंत्यसंस्कार : अंत्यदर्शनासाठी विजापूरमध्ये भक्तांची गर्दी
प्रतिनिधी/ बेंगळूर
शतकातील संत, अध्यात्मिक चिंतनशिल प्रवचनकार अशी ओळख असणारे विजापूरच्या ज्ञानयोगाश्रमचे सिद्धेश्वर स्वामीजी मंगळवारी रात्री पंचत्वात विलिन झाले. आश्रमाच्या आवारात स्वामीजींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, विविध मंत्री, अनेक मठांचे मठाधीश उपस्थित होते. तत्पूर्वी स्वामीजींच्या अंत्यदर्शनासाठी मंगळवारी पहाटेपासूनच विजापूरच्या सैनिक स्कूल मैदानावर भक्तांची गर्दी झाली होती. शोकसागरात बुडालेल्या भक्तांनी सिद्धेश्वर स्वामीजींना साश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिला.
सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास सिद्धेश्वर स्वामीजींचे ज्ञानयोगाश्रमात निधन झाले होते. रात्री त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आश्रमाबाहेर आणण्यात आले. मंगळवारी पहाटे 5 वाजता पार्थिव सजविलेल्या वाहनातून सैनिक स्कूल मैदानावर आणण्यात आले. यावेळी स्वामीजींच्या पार्थिवावर तिरंगा ठेवण्यात आला होता. सैनिक स्कूल मैदानावर राज्यभरातून तसेच शेजारील राज्यांमधून लाखोंच्या संख्येने भक्त अंत्यदर्शनासाठी आले होते. सायंकाळी 4 पर्यंत अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, भक्तांचा ओघ सुरूच असल्याने मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून ही वेळ सायंकाळी 5:30 पर्यंत वाढविण्यात आली. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई सकाळीच बेंगळूरहून विजापूरला आले. स्वामीजींचे अंत्यदर्शन घेतले. अंत्यसंस्कारातही ते सहभागी झाले.
सायंकाळी सैनिक स्कूलपासून ज्ञानयोगाश्रमपर्यंत स्वामीजींची अंत्ययात्रा काढण्यात आली. 5 कि. मी. मार्गावर अंत्ययात्रेत लाखो भक्त सहभागी झाले होते. सिद्धेश्वर स्वामीजींचे पार्थिव ज्ञानयोगाश्रमात आणल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार रात्री 9 वाजता अग्निस्पर्श करण्यात आला. अंत्यसंस्कारावेळी राज्यातील मठाधीश, राजकीय नेते, महनीय व्यक्ती आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
विजापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजयमहांतेश दानम्मनवर, जिल्हा पोलीस प्रमुख एच. डी. आनंदकुमार, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी स्वामीजींचे अंत्यदर्शन, अंत्ययात्रा आणि आणि अंत्यविधीच्या व्यवस्थेवर देखरेख ठेवली. स्वामीजींच्या निधनाचे वृत्त समजताच विजापूरला आलेल्या भक्तांसाठी आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ आणि एम. बी. पाटील यांनी भोजन, अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. शहरातील विविध पेट्रोलपंप मालक, संघ-संस्थांनीही भक्तांसाठी भोजन-पाण्याची व्यवस्था केली होती.
सिद्धेश्वर स्वामीजींच्या अंत्यसंस्कारावेळी सिद्धगंगा मठाचे सिद्धलिंग स्वामीजी, सुत्तूर मठाचे देशीकेंद्र स्वामीजी, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी, मंत्री शशिकला जोल्ले, गोविंद कारजोळ, मुऊगेश निराणी, सी. सी. पाटील, चिकोडी-सदलग्याचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, विजापूरचे खासदार रमेश जिगजिनगी, बागलकोटचे खासदार पी. सी. गद्दिगौडर, विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी, माजी मंत्री बसवनगौडा पाटील यत्नाळ, एम. बी. पाटील, लक्ष्मण सवदी, आमदार शिवानंद पाटील, ए. एस. पाटील नडहळ्ळी, आनंद न्यामगौडा, सिद्धू सवदी, रमेश भुसनूरमठ आदी उपस्थित होते.
सिद्धश्वर स्वामीजींच्या गौरवाप्रीत्यर्थ विजापूरमधील दुकानदार, व्यावसायिकांनी मंगळवारी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते. स्वामीजींच्या निधनामुळे विजापूर जिल्हा शोससागरात बुडाला. स्वामीजींच्या अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी विविध संघटना, राजकीय नेते-कार्यकर्ते, नागरिकांनी अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.