रस्ता दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचा कानाडोळा : दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. संपूर्ण रस्ता खराब झाला असून ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्डय़ांमुळे दररोज अपघात घडत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. मात्र, ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डागडुजीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने काणाडोळा केला असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते खराब झाले आहेत. पण महाराष्ट्र आणि गोवा अशा दोन राज्यांना जोडणाऱया बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गाची दूरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता खराब झाला असून वाहने चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अरगन तलाव परिसरात रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने येथील रस्ता खराब झाला आहे. तसेच हिंडलगा, सुळगा, तुरमुरी अशा गावांमधून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या दरम्यान वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. गणपती मंदिर ते गांधी चौक या दरम्यान रस्त्यावर खड्डे पडले असल्याने वाहने चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हिंडलगा गावाच्या प्रवेशद्वारापासून अर्धा किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र आंबेवाडी क्रॉसजवळ रस्त्याच्या प्रवेशद्वारावर मोठी चर निर्माण झाली असून वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. या चरीजवळच आंबेवाडी गावाकडे वळण्याचा रस्ता असल्याने खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात वाहने धडकत आहेत.
बेळगुंदी क्रॉसजवळ जीवघेणा खड्डा
सुळगा गावादरम्यान संपूर्ण रस्ताच उखडला आहे. या ठिकाणी वाहनधारक खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे अपघात घडत आहेत. तसेच बेळगुंदी क्रॉसजवळ मोठा खड्डा निर्माण झाला असून याठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. या रस्त्यावरून अन्न व नागरी पुरवठय़ाच्या गोडावूनला जाणाऱया अवजड वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. अशातच धोकादायक खड्डा निर्माण झाला असल्याने वाहनधारकांना जीवघेणे बनले आहे. तसेच उचगाव क्रॉस ते बाचीपर्यंतच्या रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाल्याने रात्रीच्यावेळी खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. बाची ते शिनोळी दरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहने कशी चालवायची? असा प्रश्न वाहनधारकांसमोर निर्माण झाला आहे.
पावसामुळे माती वाहून गेल्याने खड्डे जैसे थे
या रस्त्याची डागडुजी करण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली होती. पण केवळ माती घालून नागरिकांची दिशाभूल केली आहे. खड्डे बुजविण्यासाठी घातलेली माती पावसामुळे वाहून गेली. यामुळे रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. सुळगा गावाजवळ मुख्य रस्त्यावरच पाणी साचल्याने पावसाळय़ात मोठी समस्या निर्माण होत आहेत. पाणी साचून राहिल्याने रस्ता खराब होऊन खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने आवश्यक उपाययोजना राबविणे गरजेचे होते. पण अधिकाऱयांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याच्या देखभालीसाठी लाखो रुपये खर्ची घातले जातात. मात्र रस्त्याची स्थिती केविलवाणी असते.
देखभालीच्या नावावर खात्याकडून लूट
रस्त्यावर पाणी साचू नये याकरिता रस्त्याच्या दुतर्फा साचलेली माती व वाढलेले गवत हटविण्यासाठी दरवषी लाखो रुपये मंजूर होतात. पण पावसाळय़ापूर्वी हे काम करण्याऐवजी जानेवारी दरम्यान सदर काम उरकण्यात येते. पण काही मोजक्मयाच ठिकाणी रस्त्याची स्वच्छता करून मंजूर झालेला निधी लाटला जातो. यामुळे रस्त्यांच्या देखभालीच्या नावावर सार्वजनिक बांधकाम खात्याने लूट चालविल्याचा आरोप होत आहे. देखभालीचे कंत्राट मंजूर झालेले कंत्राटदार फिरकूनही पहात नाहीत. यामुळे हे रस्ते खराब झालेले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत बांधकाम खात्याचे वरि÷ अधिकारीही उदासीन आहेत. सदर रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.