’दिवजा सर्कल’ भागात अभूतपूर्व वाहतूककोंडी
प्रतिनिधी / पणजी
राजधानी पणजी शहरात जागोजागी बसविण्यात येणारी वाहतूक सिग्नल यंत्रणा म्हणजे सध्या ’आधीच अडचण त्यात खोळंबा’ असा प्रकार ठरू लागली आहे. या यंत्रणेमुळे सुरळीत चालणारी वाहतूक सुव्यवस्थित बनण्यापेक्षा खोळंबून पडण्याचेच प्रकार जास्त घडू लागले आहेत, अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत.
स्मार्ट सिटी प्रकल्पाचा भाग म्हणून मिरामार पासून मांडवी पूलाजवळ दिवजा सर्कलपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली आहे. कला अकादमी, बेती फेरीबोट धक्का आणि आता दिवजा सर्कल या परिसरात तसेच सांतिनेज, आदी भागात सिग्नल ’व्यवस्था’ आहे. मात्र त्यात ’व्यवस्थापन’ नाही असे चित्र दिसून येते. केवळ बेती फेरीबोट धक्क्याजवळील सिग्नलचा अपवाद वगळता अन्यत्र घोळ आणि वाहतूक व्यवस्थेतील गोंधळच दिसून येत आहे.
दोन दिवसांपूर्वीच दिवजा सर्कलजवळ कार्यान्वित करण्यात आलेली सिग्नल यंत्रणा म्हणजे अव्यवस्थेचा अभूतपूर्व नमूना ठरली आहे. वेळेचे नियोजन नसल्यामुळे सध्या तेथे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होऊ लागला आहे. जास्त करून सकाळी राज्याच्या विविध भागातून नोकरी-धंद्यानिमित्त पणजीत येणारे लोक आणि सायंकाळी काम संपवून घरी जाण्याच्या वेळी येथे जशी काही वाहनांची जत्राच भरू लागली आहे. हे प्रकार वाहतूक पोलिसांच्याही नियंत्रणा बाहेर जाऊ लागले आहेत. त्यामुळे या प्रकाराला सुविधा म्हणावे की सावळागोंधळ? असा प्रश्न वाहनचालक विचारू लागले आहेत.
सिग्नल यंत्रणा बसविण्यापूर्वी येथे नाही म्हटले तरी वाहतूक व्यवस्थेत सुटसुटितपणा दिसून येत होता. एखादवेळी वाहतूक पोलीस उपस्थित नसले तरीही लोक स्वव्यस्थापनाद्वारे उत्तम प्रकारे व्यवस्था हाताळत होते. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र क्वचितप्रसंगीच दिसत होते. आता सिग्नलमुळे व्यवस्थापनाचाच बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.
एका बाजूने रखरखणारा सूर्य, त्यातून तप्त झालेली धरती, अंगाची लाही करणारा उकाडा, शिरस्त्राणातून ओघळणाऱया घामाच्या धारा, अशा अवस्थेत कधी एकदा नियोजित स्थळी पोहोचतो अशी घाई प्रत्येकाला झालेली असते. अशावेळी सिग्नलच्या तावडीत सापडल्यामुळे लोक हैराण होऊ लागले असून वाहतूक खाते आणि पोलिसांनी यावर त्वरित उपाययोजना आखावी, अशी जोरदार मागणी खास करून दुचाकी चालकांमधून होऊ लागली आहे.