मराठी शाळेमध्ये शिकणाऱया एका पिढीने रोज नित्य नियमाने शुद्धलेखन लिहिले आहे. इयत्ता पहिलीपासून शुद्धलेखन वही मुलांसाठी शालेय पुस्तकाइतकीच महत्त्वाची होती. सुंदर हस्ताक्षराची ती सुरुवात असे. बाराखडी शिकताना प्रत्येक अक्षर सुबक, नेटके असावे याकडे शिक्षकांचे लक्ष असायचे. सुलेखन स्पर्धा, फळय़ावर खडूने सुविचार लिहिणे, पेन पेन्सिलचे वळण वेगळे, पाटीवरचे निराळे असा बालपणी अक्षरांचा उत्सवच असे. हस्ताक्षर ही एक कला आहे. भगवती शारदेचा तो कृपाप्रसाद आहे. श्रीसूक्तम्मध्ये म्हटले आहे की पूर्वजांचे हस्ताक्षर ही आपली मोठी संपत्ती आहे. मुद्रण कला अस्तित्वात नव्हती तेव्हा ग्रंथ स्वहस्ते लिहून काढण्याची पद्धत घरोघरी होती. आपली प्राचीन ग्रंथसंपदा सुंदर अक्षरात लिहून ठेवणाऱया पूर्वजांचे आपल्यावर ऋण आहेत. अक्षरांमध्ये लिहिणाऱया व्यक्तीचे मन उतरते. त्यामुळे काही शास्त्रकारांना लिहिणाऱया माणसाचा स्वभाव कळतो.
19 व्या दशकातील पहिला समास हा समर्थ रामदास स्वामी रचित श्री दासबोध ग्रंथातील लेखन क्रिया निरूपणाचा आहे. समर्थ म्हणत ‘दिसा माझी काहीतरी लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे ।’ ही आपल्या सद्गुरूंची आज्ञा समर्थ शिष्यांनी जिवेभावे जपली आणि आचरणात आणली. समर्थ संप्रदायाचे लक्षण सांगताना समर्थ म्हणतात, ‘पहिले ते लिहिणे। दुसरे ते वाचणे। तिसरे ते सांगणे। अर्थांतर’ समर्थांनी आणि त्यांच्या शिष्यांनी अफाट लेखन केले आहे. समर्थांजवळ नित्य असलेल्या कुबडीमध्ये कागद, बोरू आणि शाई असे. समर्थ भक्त सुनीलजी चिंचोलकर म्हणतात, समर्थांचे हस्ताक्षर अक्षरशः दृष्ट लागण्यासारखे होते. अक्षर कसे असावे यावर समर्थांनी बारीक-सारीक सूचना दिल्या आहेत. समर्थ म्हणतात, ‘ऐसे जपुन लेह्यावे की हस्ताक्षर पाहताच लोकांस ऐसा मोह व्हावा की ज्याचे हे हस्ताक्षर तो पुरुष पहावा. त्याच्याशी सुख संवाद साधावा.’ समर्थांचे शिष्य उंब्रज मठाधिपती केशव स्वामी यांनी 18 वेळा दासबोध लिहून काढला. कल्याण स्वामींनी दासबोधाच्या 20 प्रती लिहिल्या, तर शिरगाव मठात राहून दत्तात्रय स्वामींनी दासबोधाच्या 15 प्रती तयार केल्या. वेणा स्वामींनी विविध ग्रंथांच्या दोनशे नकला तयार केल्या. समर्थांनी आपला शिष्य कल्याण याला प्रथम भेटीत एक कित्ता भेट म्हणून दिला होता. समर्थांनी स्व अक्षरात लिहून काढलेल्या वाल्मिकी रामायणातील ते एक पान होते. समर्थांनी भिक्षा म्हणून कल्याण स्वामींच्या आई लक्ष्मीबाई यांना त्यांचा मुलगाच मागितला आणि म्हटले, आम्हाला संप्रदायासाठी हे पोर उपेगा येईल. आमचा अवघा कविता समुद्र हा लेहोन काढेल. पुढे भविष्यात तसेच घडले. ‘श्री राम समर्थ’ असे कागदावर शिरोभागी लिहून समर्थांनी एका बैठकीत सांगितलेले 205 मनाचे श्लोक कल्याण स्वामींनी स्वच्छ अक्षरात नेटके लिहून घेतले. जवळ जवळ 12 तास ही अखंड बैठक गुरुशिष्यांची चालली होती.
ज्या काळी संवाद माध्यम म्हणजे फक्त पत्र व्यवहार होता. त्या काळामध्ये सर्व संत मंडळींनी आपल्या शिष्यांना पत्र लिहिली. त्यांचे हस्ताक्षर आज उपलब्ध आहे. प.प.वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचा भारतभर संचार होता. पत्र माध्यमातून ग्रंथांची देवघेव, उपदेश, औषधे, व्यवहार दक्षता, योग अभ्यास, साधना, स्वप्नांचे अर्थ, ज्योतिष शास्त्र असे अनेक विषय सामोरे येतात. स्वामी महाराजांचा पत्र संग्रह हा एखाद्या मंत्र सिद्धग्रंथाप्रमाणे असून ते स्वामींचे पत्ररूप असे चरित्र आहे. प. प.स्वामींच्या हस्ताक्षरातील पत्रे ही स्वामींच्या परम शिष्यांच्या नित्य पठणात आहेत. गुजरातमधील तिलकवाडा हे स्वामींचे आवडते स्थान होते. स्वामी ज्यांच्या घरी नित्य जात असत त्यांच्या घरी स्वामी महाराजांचे बरेच हस्तलिखित उपलब्ध आहे. आजदेखील त्यांनी ते आधुनिक पद्धतीने जतन करून ठेवले आहे. गेली 100 वर्षे हे हस्तलिखित सांभाळून ठेवणाऱया विरंची शास्त्री यांच्याकडे स्वामीभक्त जेव्हा त्या हस्तलिखिताचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त करतात. तेव्हा ते स्नान करून सोवळे नेसतात आणि पेटीत जपून ठेवलेले कागद दाखवतात. मात्र त्यांना स्पर्श करू देत नाहीत. लांबूनच दाखवतात. पावित्र्य ते जपतात कारण ती स्वामी महाराजांची प्रत्यक्ष वाड्ःमय मूर्ती आहे. स्वामी महाराज कठोर आचरण करणारे संन्यासी होते. पुढील अनेक पिढय़ांना मार्गदर्शक होतील असे ग्रंथ लिहिण्यासाठी स्वामींनी दौत आणि लेखणी यांचा संग्रह केला हे भक्तांचे भाग्यच म्हणावे लागेल.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची ‘चैतन्य पत्रे’ उपलब्ध आहेत. त्यात महाराज भक्तांना ‘श्री रामभक्त परायण’ असा मायना लिहितात. आशीर्वाद देऊन महाराज असे म्हणतात, घोर कलीयुग असून दिवस फार कठीण येत चालले आहेत. सबब सदैव ईश चिंतनात मग्न असावे. ‘मुखी असावे रामनाम ।माता-पिता। आत्मगोत ।सखे सज्जन। बायका मुले ।यांचे राखा समाधान ।’ महाराज सर्व काळी लक्षात ठेवावा असा उपदेश करताना म्हणतात, ‘कुभांडय़ासी भांडू नका। नास्तिकाशी तंडू नका ।संसार धंदा सोडू नका। भजन भाव मोडू नका।’ परमपूज्य ब्रम्हानंद महाराजांना लिहिलेल्या पत्रात महाराज असे म्हणतात की सत्कार्याला हजारो विघ्ने येत असतात. ते सर्व एका बाजूला ठेवून शेवटला नेण्याचा प्रयत्न करावा. ‘श्रीराम समर्थ’ असे लिहून महाराज म्हणतात, पोटापुरता धंदा करून रोजच्या खर्चाचा बेत करावा. कर्ज कधीही करू नये. श्री. अण्णासाहेब घाणेकर यांच्या चंदू नावाच्या लहान मुलाला ब्रह्मचैतन्य महाराजांनी लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. महाराज म्हणतात, मारामारी करू नये, श्री रामचिंतन करावे, दररोज आई बाबांना नमस्कार करून शाळेत जावे. महाराज एक महत्त्वाची सूचना या लहान मुलाला करतात की कित्ता गिरवून अक्षर चांगले करावे. ब्रह्मचैतन्य महाराजांचे हस्ताक्षर बघून आपले मन आणि हृदय भरून येते जणू काय आपण त्यांना प्रत्यक्ष भेटलो असे वाटते.
एकेकाळी पोस्टकार्ड, आंतर्देशीय पत्र, लिफाफा असे अनेक पत्रे मजकूर भरभरून आप्त एकमेकांना पाठवत असत. त्या अक्षरांमध्ये जिवंतपणा होता. हृदयातले प्रेम, करुणा शब्दांतून उमटत असे. हस्ताक्षराची जागा यंत्राने घेतली आहे. यंत्र भावना कळवू लागले आहे परंतु जे भाव हस्ताक्षर व्यक्त करतात ते यंत्र करू शकत नाहीत. आपल्याला भविष्यकाळ अज्ञात असला तरी असे वाटते की हातात लेखणी धरून मनातले भाव झरझर उतरवणे हे विस्मरणात तर जाणार नाही ना? हस्ताक्षर केवळ सहीपुरतेच उरेल. तरीही मनात असे येते की तो दयाळू परमेश्वर जसे मुद्रण कला अद्ययावत स्वरूपात उपलब्ध असतानाही घराघरात ज्ञानेश्वरी, श्रीमद्भागवत, श्री दासबोधासारखे ग्रंथ लिहून घेतो आहे तोच हस्ताक्षराची किमया पिढय़ान पिढय़ा पुढे प्रकाशात आणेल यात शंकाच नाही. पूर्वजांचे हस्ताक्षर ही घराण्याची संपत्ती असते हे उमजले तरी पुरे.
-स्नेहा शिनखेडे