2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यासह विविध स्पर्धांचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत स्वच्छतेसाठी ‘संयुक्त भारत’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सोमवारी या कार्यक्रमांतर्गत स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. आमदार अनिल बेनके व मनपा आयुक्त रुदेश घाळी यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
स्वच्छतेसाठी संयुक्त भारत हा उपक्रम देशभर राबविण्यात येत असून आगामी एक आठवडा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तर नागरिकांनी व विविध संघटनांनी एकत्रित येऊन दि. 26 ते 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यासह स्वच्छतेबाबत स्वाक्षरी मोहीम घेण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गटांतर्गत चर्चा, चित्रकला स्पर्धा, वॉर्डस्तरीय बैठका, जागृती फेरी, पदयात्रा, डिबेट, सायकल फेरी, पथनाटय़, मॅरेथॉन, मेणबत्ती मोर्चा आणि श्रमदान आयोजित करण्याची सूचना करण्यात आली आहे. यानुसार या मोहिमेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. स्वाक्षऱयांचा उपक्रम राबवून नागरिकांना एकत्रित करून स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्यात येणार आहे. तसेच घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करणे, परिसर स्वच्छ ठेवणे याकरिता हे उपक्रम राबविण्याची सूचना शासनाने केली आहे. त्यामुळे महापालिका कार्यालयापासून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
नागरिकांचा समावेश वाढविण्याबरोबर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश या मोहिमेचा आहे. आमदार अनिल बेनके, महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांच्या स्वाक्षऱयांनी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महापालिकेचे पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी, स्वच्छता निरीक्षक संतोष कुरबेट, रुकसार व इतर स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते.