ऑक्टोबरपासून प्राप्तिकरदाता ठरणार अपात्र
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेत (एपीवाय) मोठे बदल केले आहेत. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, 1 ऑक्टोबर 2022 पासून प्राप्तिकर भरणारी व्यक्ती या योजनेत सामील होण्यास अपात्र ठरणार आहे. जर एखादा ग्राहक 1 ऑक्टोबर किंवा त्यानंतर या योजनेत सामील झाला आणि नंतर तो प्राप्तिकरदाता असल्याचे आढळले, तर त्याचे एपीवाय खाते बंद केले जाणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने अधिसूचनेमध्ये स्पष्ट केले आहे. तथापि, तोपर्यंत जमा केलेली पेन्शन रक्कम ग्राहकांना परत केली जाणार आहे. मोदी सरकारने मुख्यतः असंघटित क्षेत्रातील लोकांवर लक्ष केंद्रित करत 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती.
अटल पेन्शन योजनेंतर्गत, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळते. 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. या योजनेमध्ये किमान 20 वर्षे गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. वयाच्या अठराव्या वर्षी या योजनेत सहभागी झाल्यास दरमहा 1 ते 5 हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी ग्राहकाला दरमहा 42 ते 210 रुपये भरावे लागतील. तसेच जर एखाद्या ग्राहकाने वयाच्या 40 व्या वषी ही योजना घेतली तर त्याला दरमहा 291 रुपये ते 1,454 रुपये योगदान द्यावे लागेल. ग्राहक आपल्या खात्यामध्ये जितके जास्त योगदान देईल त्याची पेन्शन रक्कम ठरणार आहे.