स्थिती सामान्यचा कंपन्यांना लाभः मागच्या वर्षी 12 कोटी लोकांनी केला विमान प्रवास
नवी दिल्ली : जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये 12.32 कोटी लोकांनी देशांतर्गत विमान प्रवास केल्याची माहिती नागरि उड्डाण नियामक संचालनायच्यावतीने(डीजीसीए) देण्यात आली आहे. वार्षिक तत्वावरती पाहता विमान प्रवासी वाहतुकीत 47 टक्के इतकी वाढ नोंदविली गेली आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2021 मध्ये 8.38 कोटी प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. तर मागच्या वर्षी ही संख्या 12 कोटींवर पोहचली आहे. देशामध्ये डिसेंबरमध्ये विविध हवाई वाहतूक कंपन्यांनी 1.27 कोटी प्रवाशांना विमानसेवेचा लाभ मिळवून दिला आहे. मागच्या वषी याच अवधीत 1.12 कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता.
अकासा, स्पाईस जेट, इंडिगो आघाडीवर
प्रवासी क्षमता वाहून नेण्यामध्ये विविध कंपन्यांनी आपला वाटा 80 ते 90 टक्के इतका उचलला आहे. यामध्ये नव्याने हवाई क्षेत्रामध्ये पदार्पण केलेल्या अकासा एअरने डिसेंबरमध्ये 83 टक्के प्रवाशी क्षमतेसह विमानसेवा राबविली. याच्या पाठोपाठ स्पाईस जेटने विक्रमी 92 टक्के प्रवाशांसह तर इंडिगो कंपनीने 87 टक्के प्रवाशांसह डिसेंबरमध्ये विमानसेवा राबविल्याचे दिसून आले. दुसरीकडे एअर इंडियाने 89 टक्के आणि गो फर्स्ट यांनी 92 टक्के प्रवाशांसह डिसेंबरमध्ये सेवा राबविली होती.
देशातील परिस्थिती सध्या पूर्वपदावर आली असल्याचेच एकंदर प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार दिसून येत आहे. सरकारने यासाठी आवश्यक ते उपक्रम राबविले असल्याने प्रवाशांची संख्या नियमित राहिली आहे. देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर गेल्या काही आठवडय़ांमध्ये प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. देशांतर्गत वाहतूक करणाऱया प्रवाशांची संख्या विमानतळांवर दिवसाकाठी 4 लाखांपर्यंत पोहोचली असल्याचेही सांगितले जात आहे. प्रवाशांची संख्या वाढल्याने विविध विमानतळांवरती मागच्या महिन्यामध्ये विमानांची व प्रवाशांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली.