65 वर्षांपासून कोल्हापुरात वास्तव ; विविध जाती-धर्मांशी जुळवून घेत समाज बांधवाचा सुरु आहे उदरनिर्वाह ; शिक्षण मराठीत अन् बोलतातही अस्सल मराठीतच
संग्राम काटकर, कोल्हापूर
राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जपत राहणाऱ्या हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन,जैन व बौद्ध धर्मियांसोबत शिखधर्मातील शिख सिकलीकर समाजही कोल्हापुरात गुण्यागोविंदाने राहत आहे.65 वर्षापूर्वी कोल्हापुरात आलेला हाच शिख सिकलीकर समाज आता पक्के कोल्हापूरचा झालायं.स्वतःच्या मालकीची घरेही समाज बांधवांनी बांधली आहेत.या घरातील कर्ती मंडळी लोखंडाशी संबंधीत व्यवसाय करत कुटुंब चालवत आहेत.बहुसंख्य तरुण-तरुणींसह वयाची पन्नाशी गाठलेल्या सर्वांनीच मराठी शाळा,कॉलेजातून शिक्षण पूर्ण केले आहे.त्यामुळे हे सर्वजण पंजाबीबरोबरच मराठी बांधवांच्या संगतीने अस्सल मराठी बोलत आहेत.दैनंदिन जीवन जगतानाही कोल्हापुरातील मराठी बांधवांसह सर्व धर्मियांशी सलगीने राहूनच जीवन जगण्याला शिख सिकलीकर समाज आजही प्राधान्य देत आहे.
शिख सिकलीकर समाजाची कोल्हापुरातील लोकसंख्या सहाशे ते सातशेच्या आसपास आहे.विविध रंगाची पगडी व परना डोक्याला बांधून वावरत असलेल्या या समाज बांधवांच्या कुटुंबाची कलानी,दुधानी,बावरी,रबाली,टाक व भौंड अशी आडनावे आहेत. हा सिकलीकर समाज कोल्हापुरात येण्यामागे मोठा इतिहास आहे. 300 वर्षापूर्वी शिखधर्मातील 10 वे गुरु गोबिंदसिंग हे मुघलांशी संघर्ष करत करत नांदेडमध्ये आले होते.त्यांच्या सैन्यासाठी शस्त्रांस्त्र तयार करणारा सिकलीकर समाजही नांदेडमध्ये आला होता.काही काळानंतर गोबिंदसिंग यांनी सचखंड हजूर साहेब गुरुद्वार येथे समाधी घेतली.यानंतर काही वर्षानंतर हा सिकलीकर समाज महाराष्ट्रासह कर्नाटक,गुजरात, हैदराबादकडे विखुरला.
60 ते 65 वर्षापूर्वी आगमन अन् उदरनिर्वाह
नांदेडहून भटकंती करत सिकलीकर समाजातील मोजकी कुटुंबे 60 ते 65 वर्षापूर्वी कोल्हापुरात आले.रोजगार करुन उपजिवीका एवढाच कोल्हापूरात येण्यामागेचा त्यांचा उद्देश.पुढील काही वर्षांत या समाजातील कुटुंबे सदरबाजारनजिकच्या विचारेमाळ,राजेंद्रनगर,उचगाव,मणेरमळा,गांधीनगर,उजळाईवाडी व कणेरी या भागात विस्तारली.कुंटुंबातील कर्त्या महिला-पुरुषांनी उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून लोखंडी तवा,कडई,झारे,बुटय़ांची निर्मितीचा व्यवसाय सुरु केला.या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर उदरनिर्वाह सुरु झाला.व्यवसाय चांगला चालावा यासाठी सिकलीकर समाजाने मराठी भाषाही शिकली. जसा व्यवसाय चांगला चालू लागला तशी आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. त्यामुळेच अनेकांनी हक्काची घरे ही घेतली.
मराठीतून शिक्षण
विचारेमाळमधील सिकलीकर कुटुंबांनी आपल्या मुला-बाळांना शालेय-कॉलेजमधील शिक्षणसाठी मराठी माध्यमाच्या कोरगावकर हायस्कूल व राजर्षी शाहू कॉलेजात दाखल केले.राजेंद्रनगर,उचगाव,गांधीनगर,मणेरमळा, उजळाईवाडी येथे राहणाऱया कुटुंबांनीही जवळच्या मराठी शाळा, कॉलेजात मुला-मुलींना घातले. मराठीतून शिक्षण घेतलेली पहिली पिढी आता वयाच्या पन्नाशीच्या आसपास आहे. मराठी बांधवांच्या संगतीने ही पिढी अस्सल मराठी बोलत आहे. त्यांच्या बोलण्यात पंजाबी टोन दिसत नाही. मराठी शिकलेल्या या पिढीने प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत लोखंडाशी संबंधीत पण चांगले पैसे कमवून देणारे पॅब्रीकेशन, क्रॅप गोळा करणे, बॅरल सप्लाय व सिमेंटची पाईप तयार करण्यासाठी लागणारे साचे बनवणे असे व्यवसाय सुरु केले. कामांच्या ऑर्डरी ही मिळू लागल्याने समाजाची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली. ज्यांना व्यवसाय करता आला नाही, त्यांनी सेंट्रीग, गवंडी, कारखान्यातील काम स्वीकारुन उदरनिर्वाह सुरु ठेवला.
हिंदू बांधवाप्रमाणेच सण साजरे करतो….
कोल्हापूरकरांशी जुळवून घेत शिख सिकलीकर समाज हा पंजाबच्या परंपरेनुसार दरवर्षी गुरुनानक जयंती, गुरुगोबिंदसिंग जयंती साजरी करतोच. शिवाय हिंदू बांधवाप्रमाणे खंडेनवमी, दसरा, दिवाळी, होळी हे सणही करतो. विचारेमाळमधील काही तरुणांनी तर सामाजिक उपक्रमासाठी भगतसिंग तरुण मंडळाची स्थापना केली आहे. हे मंडळ गेल्या 8-10 वर्षांपासून गणेशोत्सव साजर करते. हिंदू बांधवाप्रमाणे गणेश आगमन व विसर्जनाचे कार्य करतानाच उत्सवात गणेशाची संपूर्ण आराधना करतात.