पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे विधान
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्याच्या निर्णयाला आता 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पुन्हा एकदा कलम 370 ची आठवण झाली आहे. काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात आल्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने मौन बाळगले. भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले, परंतु भारतात मोठी बाजारपेठ असल्याने प्रत्येकाने त्याकडे डोळेझाक केल्याचा दावा इम्रान यांनी केला आहे.
5 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारने काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेत संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचे उल्लंघन केले. त्यानंतर मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील लोकसंख्येच्या स्वरुपात बदल करत जिनिव्हा कन्व्हेंशन अंतर्गत युद्धगुन्हा केल्याचा दावा इम्रान यांनी केला आहे.
भारतातील सर्व अंतर्गत कायदे आणि संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचे उघड उल्लंघन करण्यात आल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय समुदायाची सोयिस्कर नैतिकता आणि मौन निंदनीय आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या मोठय़ा बाजारपेठेमुळे गप्प आहे. भारताची धोरणात्मक भागीदारी पाहता आंतरराष्ट्रीय शक्ती मौन बाळगत असल्याचा आरोप इम्रान यांनी केला आहे.
इम्रान यांच्यासोबत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही काश्मीर मुद्दय़ावर प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरप्रकरणी भारताने एकतर्फी केलेल्या कारवाईला तीन वर्षे पूर्ण झाली असून याचा उद्देश जम्मू-काश्मीरचा आंतरराष्ट्रीय मान्यता आणि लोकसंख्येचे स्वरुप बदलणे असल्याचा दावा शरीफ यांनी केला आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारने जम्मू-काश्मीमधून कलम 370 हद्दपार करण्यात आले होते. याचबरोबर जम्मू-काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले होते.