प्रतिनिधी/ रत्नागिरी
चांदा ते बांदा योजना सिंधुदुर्ग जिल्हय़ात उत्कृष्टपणे राबविली. त्याप्रमाणेच सिंधुरत्न समृध्द योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही योजना सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरी जिल्हय़ाच्या कानाकोपऱयात येथील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेउन पोहोचवली जाईल. योजनेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱया उपक्रमांसाठी आवश्यक निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे आमदार तथा सिंधुरत्न योजना कार्यकारी समिती अध्यक्ष दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सिंधुरत्न समृध्द योजना अंमलबजावणी प्रशिक्षण कार्यशाळा सोमवारी अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी येथे पार पडली. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे रत्नागिरीचे पालकमंत्री ऍड. अनिल परब, खासदार विनायक राऊत आणि आमदार योगेश कदम उपस्थित होते तर आमदार तथा सिंधुरत्न योजना कार्यकारी समिती अध्यक्ष दीपक केसरकर, आमदार राजन साळवी, आमदार तथा कार्यकारी समिती सिंधुरत्न योजना विशेष निमंत्रित शेखर निकम, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, कुलगुरु मुंबई विद्यापीठ सुहास पेडणेकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु संजय सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा विशेष निमंत्रित प्रफुल्ल सुद्रीक, जिल्हा नियोजन अधिकारी रत्नागिरी सत्यविनायक मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी सिंधुदुर्ग दिलीप पवार आदी मान्यवर तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ातील संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी दोन्ही जिल्हय़ाच्या जिल्हाधिकारी यांनी या योजनेच्या आराखडय़ाचे सादरीकरण केले.
सिंधुरत्न कार्यकारी समिती अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी सादरकरणावेळी संबधित विभागांच्या अधिकाऱयांशी विविध विषयावंर चर्चा केली. या योजनेतून बांबू लागवड, मत्स्य व्यवसाय, कृषी, बचतगट, कोळंबी उत्पादन केंद्र, रोजगार क्षेत्र, पर्यटन, काजू प्रक्रिया, आंबा प्रक्रिया आदी उद्योगांना अधिक चालना मिळणार असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या योजनेमुळे या दोन्ही जिल्हय़ातील विकासात्मक गुणात्मकतेतही फरक आढळणार आहे. सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरीत पर्यटक कमी प्रमाणात येतात. पण रत्नागिरी जिल्हय़ाला पर्यटनाच्या बाबतीत तोडीस तोड आणण्याचे ध्येय या योजनेतून ठेवण्यात आल्याचे केसरकर यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हय़ाचे उत्पन्न वाढेल याकडे लक्ष देण्यात आले आहे.
रोजगार, आर्थिक उन्नती, वैयक्तिक उत्पादन वाढीसाठी उपयुक्त–खासदार राउत
सिंधुदुर्ग जिल्हय़ाबरोबर आता रत्नागिरी जिल्हय़ासाठी ही योजना राबविली जाणार असल्याने रत्नागिरीसाठी सुवर्णसंधी मिळाली आहे. ही योजना चांदा ते बांदा या योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येत असून रोजगार, आर्थिक उन्नती, वैयक्तिक उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.