पिकांचे नुकसान, बंदोबस्ताची मागणी
प्रतिनिधी /खानापूर
असोगा परिसरात गवीरेडय़ांचे कळप पिकांत घुसून नुकसान करत आहेत. भात रोप लागवडीसाठी तयार करण्यात आलेल्या तरुचे नुकसान या गवीरेडय़ांकडून होत आहे. त्यामुळे शेतकऱयांना रोप लागवडीसाठी भात रोपांच्या नासाडीमुळे शेत पड ठेवण्याची वेळ आली आहे. वनखात्याने गवीरेडय़ांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेती करणे कष्टदायक बनले आहे. अलीकडे गवीरेडय़ांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. हे गवीरेडे कळपाने वावरत असून अलीकडे ते शेतात आणि वस्तीजवळ येत असल्याने उभ्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करीत आहेत. पेरलेले भात नुकतेच उगवून वर आलेले असताना त्यातही गवीरेडे चरत आहेत. तसेच भात रोप लागवडीसाठी तयार करण्यात आलेल्या तरुचेही नुकसान या गवीरेडय़ांकडून होत आहे. त्यामुळे भातरोप लागवड करणे कठीण बनले आहे. भात रोप लागवडीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने भातरोप उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे भातजमीन तशीच पड ठेवण्याची वेळ शेतकऱयांवर आली आहे. तरी वनखात्याने गवीरेडय़ांचा बंदोबस्त करावा व नुकसानीचा पंचनामा भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.