प्रदूषणात वाढ, जुन्या बस सेवेत : दुरुस्तीकडे परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष : प्रवाशांची गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
परिवहन मंडळाकडून नादुरुस्त बस सोडल्या जात असल्याने बसच्या समस्या वाढल्या आहेत. बेळगाव-खानापूर मार्गावर धावणाऱया बसमधून बुधवारी मोठय़ा प्रमाणात धूर बाहेर पडल्याने प्रदूषण निर्माण झाले होते. दरम्यान पाठीमागून येणाऱया वाहनधारकांना मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे परिवहनने दुरुस्त करून बस सोडाव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे परिवहनला प्रचंड फटका बसला आहे. दरम्यान, परिवहनला नवीन बस खरेदी करणे शक्य नाही, त्यामुळे परिवहनच्या ताफ्यात जुन्या बसची संख्या अधिक आहे. शिवाय बीएमटीसीनेदेखील परिवहनला जुन्या बस दिल्या आहेत. त्यामुळे विविध मार्गावर जुन्या नादुरुस्त बस धावत आहेत. त्यामुळे नादुरुस्तीचे प्रकार वाढल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
कोरोनानंतर विविध मार्गावर बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेषतः ग्रामीण आणि जवळच्या पल्ल्यासाठी जुन्या आणि नादुरुस्त बस पाठविल्या जात आहेत. बस रस्त्यात बंद पडणे, धूर सोडणे, बेक फेल होणे आदी प्रकार वाढले आहेत. अशा बिघाड झालेल्या बस सोडल्या जात असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे. बसगाडय़ाची व्यवस्थित दुरुस्ती करण्याऐवजी केवळ नाममात्र दुरुस्ती केली जात असल्याने नादुरुस्त बसची संख्या वाढली आहे.
पावसाळय़ात जुन्या बस नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे प्रवाशांना इतर वाहनांवर अवलंबून रहावे लागत आहे. ग्रामीण भागात धावणाऱया बसमध्ये जुन्या आयुष्यमान संपलेल्या बसची संख्या अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जुन्या बस थांबवून प्रवाशांसाठी नवीन बस पाठवाव्यात, अशी मागणी होत आहे.
नवीन बस खरेदीसाठी शासनाकडे प्रस्ताव
पावसाळय़ापूर्वी जुन्या व नादुरुस्त बस दुरुस्त केल्या आहेत. शिवाय नवीन बस खरेदीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. काही ठिकाणी बसची कमतरता आहे. त्यामुळे जुन्या बस दुरुस्त करून पाठविल्या जात आहेत. दैनंदिन बससेवेबरोबर इतर ठिकाणी धावणाऱया बसची संख्या वाढली आहे.