रस्त्यावरून ये-जा करणाऱया नागरिकांमध्ये धडकी : लहान मुले, रुग्णांवर विपरित परिणाम, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
स्टाईल मे रेहनेका…. या नादात आपल्याकडून वाहतुकीचे नियम पाळले जातात का? किंवा कोणाला त्रास होतो का? याचे भान सध्या तरी बेळगाव शहर आणि परिसरात दिसून येत नाही. त्यामुळे कर्कश प्रकारचे हॉर्न, धूमस्टाईल वेग हे ठरलेलेच असताना बुलेटसारखी वाहने चालविणाऱयांकडून सायलेन्सर ब्लास्ट हा विकृत प्रकार सुरू झाला आहे. अशा मंडळींवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. आरटीओ विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.
हातामध्ये वाहन असले की त्याचा योग्य ठिकाणी योग्य वेळेत पोहोचण्यासाठी वापर करणे ही प्रकृती आहे. मात्र आवश्यक तितका वापर करण्याचे सोडून विविध विकृत प्रकार करणारे वाहनचालक शहरात वाढत आहेत. वाहनांच्या अतिवापरामुळे प्रदूषण होते. तरीही वाहनांचा वापर अनिवार्य ठरला आहे. मात्र हा वापर करताना नियम पाळण्याचे सोडून भलतेच प्रकार करणाऱया मंडळींमुळे नागरिकांना त्रासाचे ठरत आहे. बालके व रुग्णांना तसेच वृद्ध मंडळींना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. स्टाईल करणाऱया व्यक्तींमुळे रस्त्यावरून चालणाऱयांच्या उरात धडकी भरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहर परिसरात वाहनांवरून जात असताना भलतेसलते आवाज काढून नागरिकांची झोपमोड करण्याचा प्रकार पहावयास मिळतो. अशा घटना मध्यरात्री घडल्याने गस्तीवरील पोलिसांनी अशा तरुणांना हटकून चोप दिला पाहिजे. रात्रीच्यावेळी कारवाई होणे हा प्रकार स्तुत्य आहे. मात्र दिवसा असेच प्रकार करून त्रासदायक ठरणाऱया मंडळींवर पोलीस प्रशासन का कारवाई करत नाही? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
आरटीओ व पोलिसांनी मध्यंतरी संयुक्तपणे मोहीम हाती घेतली होती. मात्र कालांतराने ती बारगळली. मागील आठ दिवसांपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र म्हणावा तसा प्रयत्न झाला नसल्याचे पहावयास मिळाले. दिवसा प्रमाणापेक्षा अधिक वेगाने वाहने हाकणाऱयांवर कारवाई करण्यासाठी शहरातील रस्त्यांवर सर्वप्रथम वेगमर्यादा घालण्याची गरज आहे. अन्यथा पुढील काळात हे प्रकार आणखी त्रासदायक ठरण्याची शक्मयता आहे.
शहरात भरधाव वाहने हाकल्याने अनेकजण जखमी तर अनेकांचे प्राणही जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे शाळा, महाविद्यालय परिसरातही वाहने जोराने हाकण्याचे प्रकार घडू लागले आहेत. तेव्हा भरधाव वाहने चालविणाऱयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वारंवार होत आहे. नागरिकांनी केलेल्या मागण्यांची निवेदने केराच्या टोपलीत फेकण्याचा प्रकार प्रशासकीय अधिकारी करू लागले आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
आरपीडी महाविद्यालय, टिळकवाडी, भाग्यनगर, कॉलेज रोड व इतर कॉलेज परिसरात अशा घटना जास्त घडत आहेत. अशा वाहनचालकांवर नजर ठेवण्यासाठी कॉलेज परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. यामुळे निश्चितच भरधाव वाहन चालविणाऱया वाहनचालकांना चाप बसेल. एका मोटारसायकलवर तिघे-चौघे बसून वाहने चालविली जात आहेत. यामुळे इतर वाहनचालकांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. शाळा व महाविद्यालय परिसरात रहदारी पोलिसांची नियुक्ती करून अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
वाहने चालविण्याबाबत तसेच सूचनांचे पालन करण्यासंदर्भात जागृतीसाठी विविध रस्त्यांवर फलक असणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनचालकांवर कठोर कारवाई होणेही गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात तरुण जाणूनबुजून जोराने वाहने चालवतात. याचा विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत आहे. कर्णकर्कष आवाज काढण्यासाठी सायलेन्सर बदलले जाते. या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत आहे.
…पण जबाबदारीने वागा
बुलेटसारखी बोजड वाहने वापरण्याची क्रेझ पुन्हा एकदा वाढू लागली आहे. रुबाबदार वाहन चालविताना आपण जबाबदार वागण्याची पेझ मात्र तरुणाईमध्ये दिसत नाही. सायलेन्सर फोडून घेऊन त्यातून अतिकर्कष आवाज कसा काढता येईल, याची स्पर्धा जास्त आहे. शिवाय विशिष्ट पद्धतीने एखाद्या बॉम्ब स्फोटापेक्षाही भयानक आवाज काढून रस्त्याने ये-जा करणाऱयांना घाबरविण्यात धन्यता मानणारे तरुण वाढत आहेत. जोवर कारवाई होत नाही, तोवर हे प्रकार बंद होणे कठीण आहे. अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाईची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी अशी वाहने जप्त करण्यावरही भर देणे गरजेचे आहे.