देहराडून / वृत्तसंस्था
उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 203 यात्रेकरूंना प्राण गमवावे लागले. या 203 भाविकांमध्ये केदारनाथ यात्रेतील 97, बद्रीनाथ धाममधील 51, गंगोत्रीमधील 13 आणि यमुनोत्रीमधील 42 यात्रेकरूंचा समावेश आहे. हे मृत्यू हृदयविकार आणि इतर आजारांमुळे झाल्याचे उत्तराखंड आपत्कालीन केंद्राने स्पष्ट केले आहे.
यंदा केदारनाथ यात्रेसह चारधाम यात्रा 3 मे पासून सुरू झाली असून, आतापर्यंत 25 लाखांहून अधिक लोकांनी प्रवास केला आहे. मात्र, गेल्या आठवडाभरात प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. चारधाम यात्रेला येणाऱया भाविकांची गर्दी पाहता राज्य सरकारने आधीच सतर्कतेचा इशारा दिला होता. यासोबतच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हिमालयातील मंदिरांमध्ये जाण्यापूर्वी आरोग्य तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यात्रेच्या सुरुवातीपासूनच भाविक दर्शनासाठी मोठय़ा संख्येने येत असल्यामुळे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी व्हीआयपी प्रवेशावरही बंदी घातली होती.