वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची प्रतिक्रिया
जगन्नाथ मुळवी/ मडकई
समाज पातळीवर उभ्या केलेल्या जाती पातीच्या अभेद्य भिंती सार्वजनीक गणेशोत्सव मंडळे भेदतात. म्हणूनच सलोख्याचे नाते निर्माण होत असते. हिंदू धर्मात अत्यंत वंदनीय असलेला विघ्नहर्ता सामाजीक विघ्ने दूर करून त्याच्या ठायी असलेल्या चौसष्ठ कलांचे दान देतो. त्यामुळेच या भूमीशी असलेली नाळ अधिक घट्ट होते. माणूस समृद्ध होण्यासाठी गावांगावात अशी सार्वजनीक गणेशोत्सव मंडळे स्थापन होणे ही काळाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दै. तरूण भारतच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.
मडकई मतदार संघात जवळ जवळ अकराहून अधिक सार्वजनीक गणेशोत्सव मंडळे कार्यरत आहेत. त्यांचे उत्कृष्ट कार्य पाहून या मतदार संघाचा आपण आमदार असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो असेही त्यांनी नमूद केले. मडकई मतदार संघातील सर्व सार्वजनीक गणेशात्सव मंडळांना भेटी दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या कार्याचा विस्तार होताना मन सुखावून जात आहे. ढवळीचे सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ, कवळे रथामळ, बांदिवडे बंदर, व्हरड गावणे व पारंपाईचा बाल गोपाळ, कोनर, आडण, वडाळ, मडकई, आक्सण, दुतळे, मावजो व कुंडई गणेशोत्सव अशी कितीतरी सार्वजनीक गणेशात्सव मंडळे मतदार संघात कार्यरत आहेत. त्यामुळे मडकई मतदार संघात अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तीमय वातावरण तयार झालेले असते. अनेक कार्यक्रमांमुळे हा मतदार संघ गजबजलेला असतो. या भक्तीमय वातावरणाच्या आनंदात आपण अनेक कार्यकर्त्यांना घेऊन या सार्वजनीक गणेशात्सव मंडळाना भेटी देत असतो. मंडळांचे कार्य, कार्यंक्रम व उपक्रम यांची माहिती जाणून घेत असतो.
गेली 23 वर्षे आपण मंडळांना भेटी देऊन त्यांच्या समस्याही जाणून घेत, त्यावर उपययोजना आखत आहे. सर्व सार्वजनीक गणेशोत्सव मंडळे महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पाककला, मेहेंदी, रांगोळी, पुष्पहार गुंफणे, फुगडय़ा, आरत्या सादरी करण अशा अनेक स्पर्धा घेऊन त्यांच्यामध्ये असलेल्या कलेची विण घट्ट करीत आहे. गावातील अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देताना राष्ट्रीय पातळीवर कलाकारांच्या कलेच्या माध्यमातून दर्शन घडवित असतात. त्यांचे हे कार्य अधिक समृद्ध व्हावे म्हणून सर्वांनीच संघटीत होऊन हातभार लावल्यास श्री गणेशाची कृपा सर्वांनाच लाभेल, असे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पुढे बोलताना सांगितले.
महाभारत या महाकाव्याची निर्मिती व्यासमुनींनी श्री गणेशाकडून लिहून घेतली. हिंदू धर्मात अनेक देवदेवतांचे उत्सव वर्षातून एकदा किंवा दोनदा साजरे होत असतात. मात्र श्री गणेशांची संकष्टी चतुर्थी, विनायकी, गणेश जयंती असे व्रत वर्षभर होत असतात. गणेश चतुर्थीच्या काळात दीड दिवसांपासून अनंत चतुर्दशीपर्यंत मोठय़ा उत्साहात गणपतीचे सेवा केली जाते. काही कारणास्तव चतुर्थीत अडचण आल्यास नवरात्रोत्सवात किंवा त्यानंतर एकदा असे दोनवेळा गणपती पुजण्याची सोय हिंदू परंपरेत आहे. त्यातून गणेशाचे महत्त्व अधोरेखीत होत आहे.
श्री गणेश हे भक्तांचे आराध्य दैवत असल्याने त्यांना निरोप देताना लहान मुलांचे मन भरुन येत असल्याचे व्हीडिओ समाज माध्यांवर झळकत आहेत. पुराण काळापासून असलेल्या श्री गणेशाच्या अनेक कथा शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना सांगून त्यांच्यामध्ये भक्तीचे बिज पेरताना त्यांनीही सामाजीक उन्नतीसाठी कार्य करण्यासाठी प्रेरीत करावे. तसेच गणेशात्सव मंडळानी अशा कथांच्या स्पर्धाही आयोजीत करून चतुर्थी उत्सवाचे महत्त्व वाढविण्याचे आवाहन वीजमंत्री ढवळीकर यांनी केले.
माटोळीचे महत्त्व अधोरेखीत क्हायलाच हवे. निसर्गांने निर्माण केलेली प्रत्येक वनस्पती व फळांची बांधणी व पुजन व्हायलाच हवे. कित्येक कलाकार त्यांची कसब पणाला लावून आपल्यातील अंगभूत कला सिद्ध करण्यासाठी रानमाळ भटकून वेगवेगळी वनस्पती व फळे गोळा करतात. त्यातून कलात्मक प्रतिकृती तयार करतात. या निमित्ताने औषधी वनस्पती व फळांचा परिचय होत असतो. अशा कालाकारांनी निर्माण केलेल्या माटोळी कलेला खुल्या मनाने दाद देऊन त्यांचे कौतुक करीत असल्याचे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.