पश्चिम बंगालमधील पिहु मंडल यांची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. त्या चौदा वर्षांच्या असताना त्यांची विक्री करण्यात आली होती. मानवी तस्करी करणाऱया टोळीने त्यांना अन्यत्र अधिक पैशांना विकण्याचा घाट घातला होता. मात्र, त्या या टोळीला गुंगारा देऊन तिच्या तावडीतून निसटल्या. आपल्या गावी पुन्हा परतल्या. तथापि, परपुरुषांबरोबर काही दिवस राहिल्यामुळे त्यांच्या चारित्र्यावर गावकऱयांकडून संशय घेतला गेला. त्यांना ‘धंदेवाली’ ठरविण्यात आले. मात्र, या बहिष्कारामुळे मानसिकदृष्टय़ा खचून न जाता त्यांनी आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली.
काही सहृदय व्यक्तींनी त्यांना त्यांचे आयुष्य पुन्हा प्रस्थापित करण्यामध्ये साहाय्य केले. आज त्या 21 वर्षांच्या असून आपल्याप्रमाणे मानवी तस्करीच्या शिकार बनलेल्या महिलांच्या मुक्तीचे कार्य करीत आहेत. इंडियन लिडरशीप फोरम अगेन्स्ट हय़ुमन ट्रफिकिंग (इल्फत) या संस्थेच्या त्या महत्त्वपूर्ण नेत्या आहेत. सर्वसाधारणपणे मानवी तस्करीच्या शिकार झालेल्या महिला आपली ओळख जाहीर करीत नाहीत. तथापि, पिहु यांनी तसे केलेले नाही. उलट आपल्यापासून अशा संकटात सापडलेल्या महिलांना स्फूर्ती मिळावी, यासाठी त्यांनी स्वतःच्या खऱया नावानेच आपले कार्य पुढे चालविले आहे. त्यांचे वडील रोजंदारीवर मजूर होते तर आई गृहिणी होती. त्यांच्या कुटुंबाकडे इंचभरही जमीन किंवा उत्पन्नाचे अन्य साधन नव्हते. गावात आजही मुलींना शिकविण्याची पद्धत नाही. तथापि, पिहु यांना शिकण्याची हौस होती आणि भविष्यात सरकारी अधिकारी बनण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. चौदाव्या वषीच त्या दहाव्या इयत्तेत पोहोचल्या होत्या. तथापि, त्याचवेळी त्यांच्या नकळत फसवणुकीच्या मार्गाने त्यांची विक्री करण्यात आली.
मानवी तस्करी करणाऱया टोळीपासून सुटका करण्यासाठी त्यांनी रेल्वेची चेन खेचून पळ काढला होता. रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलिसांची मदत घेतली होती. रेल्वे पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरी पोहोचविले. तथापि, परत आल्यानंतरचा अनुभव अत्यंत घृणास्पद होता. तशाही परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण करून आता मानवी तस्करीच्या बळी ठरलेल्या महिलांच्या पुनर्वसनाचे कार्य हाती घेतले आहे.