अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे कालच्या वर्षश्राद्ध ( बरसी ) नंतर शिल्लक राहिलेले शिळे अन्न खाल्ल्याने २० जणांना अन्न विषबाधा झाली. रुग्णांना तातडीने ग्रामीण रुग्णालय अक्कलकोटमध्ये दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. अशोक राठोड यांनी सांगितले.
सलगर गावातील नबीलाल चौरगस्ते यांचे वडिल अब्दुल गनी चौरगस्ते यांचे गुरुवार दि ९ जून रोजी पहिले वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त जेवणाचा कार्यक्रम पार पडला. पण दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि १० रोजी घरातील २० जणांनी आदल्या दिवशीचा शिळा भात, आमटी, बुंदी, लाडू खाल्ल्याने अर्ध्या तासानंतर सगळ्यांना उलटी, चक्कर व जुलाब सुरू झाले. अत्यवस्त लोकांना सलगर गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचारासाठी नेले. पण उपकेंद्रात कोणीही आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने त्यांना तातडीने अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल तातडीने उपचार सुरू केले. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.