गारपिटीमुळे कलिंगड, टरबूज, आंबा, चिंच मोठे नुकसान
प्रतिनिधी/अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे पंचक्रोशीतील गावांना शनिवारी पाचच्या दरम्यान मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने चांगलेच झोडपल्याने या भागातील केळी, कलिंगड, टरबूज, पपई, फुले, फळे यासह वेलवर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अगोदरच मेटाकुटीला आलेला बळीराजा पून्हा अवकाळी पावसामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळे फळबागांचे व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
बोरगाव दे, घोळसगाव, बादोले,पालापूर, शिरवळ या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. वातावरणात प्रचंड उकाडा व वातावरणात तफावत जाणवत होते.अशातच विजेच्या लपंडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. सुरुवातीला प्रचंढ वादळी वारे सुटले होते त्यामुळे चिंच आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडले. सगळीकडे धुळीचे लोट व प्रचंढ वाऱ्यामुळे अनेकांचे पत्रे उडाले. यानंतर मेघगर्जनेसह मुसळधार पावसासह गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडले असून आंब्याची गळती मोठ्या प्रमाणात झाली आहे. तापमानाचा पारा ४२ – ४३ वर गेला होता. त्यातच शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे गारठा वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणा दरम्यान दुपारी 5 वाजताच्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव आणि जिल्ह्यातील इतर गावांत ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील उन्हाचा जोर कमी झाला होता. त्यातच आता गारांसह पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. उन्हाळी पिकाचे नुकसान होणार आहे.