सिंदखेड येथे मुस्लिम कुटुंबात गौराईचे थाटामाटात पूजन; साडेतीनशे वर्षाची परंपरा जपतो आहे सिंदखेडचा पठाण कुटुंब
अमोल फुलारी/अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड या गावात आयुब बाबूलाल पठाण या दाम्पत्याने गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या राहत्या घरी गौराई (लक्ष्मी) बसवतात. पठाण कुटुंब हे मंगरूळ ता. तुळजापूर येथील असून ५० वर्षांपूर्वी कामाच्या शोधत व पोटापाण्यासाठी सिंदखेड या गावी आले. मंगरूळ या ठिकाणी शेतात काम करत असताना फत्तुभाई पठाण यांना लक्ष्मीच्या गाठी सापडल्या. त्यानंतर त्यांनी जाणकारांना विचारून आपल्या घरी गौराई (लक्ष्मी) ची प्रतिष्ठापना केली. या गोष्टीला आज साडेतीनशे वर्षाचा काळ गेला पण पठाण कुटूंब आजही अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड गावी अत्यंत भक्तिभावाने व मनोभावे प्रतिष्ठापना करतो. विधिवत पूजा- अर्चा, नैवेद्य आरती करून नामस्मरण करतात. व भक्तिभावाने हा उत्सव आपल्या संपूर्ण कुटुंबासह साजरे करतात. सबका मलिक एक हा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सिंदखेड हे गाव बाराशे लोकवस्तीचे छोटेसे गाव असून गावात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. प्रत्येक जातीच्या सण उत्सवात एकत्रित येऊन अनेक सण साजरे करतात. जात, धर्म, पंथ, वंश असा भेद न मानता सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन हिंदू – मुस्लिम समाजातील सण उत्सव भक्तिभावाने साजरे करतात.
आयुब पठाण व त्यांची पत्नी आयेशाबी हे दाम्पत्य गौराई आगमन वेळी संपूर्ण घराची स्वच्छता, धुणी – भांडी कपडे व रंगरंगोटी करत असतात.गौराई साठी लागणारे कपडे,फळे,फराळाचे साहित्य यांची जमवाजमव करतात.सजावटीसाठी संपूर्ण कुटुंब या कामात व्यस्त असतो.गौराई अगमनावेळी घरात व कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. पारगावहुन पै -पाहुणे व नातेवाईक ही आवर्जुन भेट देतात.हिंदू धर्माप्रमाणे गौराईची पूजा, पूरण पोळीचे नैवेद्य,आरती केली जाते.
मुस्लिम कुटुंब असल्याने मांसाहार हे काय नवीन नाही पण गौराई आगमन काळात मांसाहार कुणीही खात नसून त्याचा कटाक्ष पाळतात. पठाण कुटुंबातील या गौराई उत्सवाचे पंचक्रोशीतून कौतुक केले जाते. गौराई अगमनापासून यांच्या घरात सुख-शांती समृद्धीसह गोकुळ नांदतो असे यावेळी आयुब पठाण व त्यांच्या पत्नी आयेशाबी बोलत होत्या. या माध्यमातून हिंदू – मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश दिला आहे.
आमच्या पाच पिढ्यापासून गौराई ( लक्ष्मी )आगमन पूजन करत आहोत. कोणताच भेद आम्ही पाळत नसून सबका मलिक एक या प्रमाणे ईश्वर हा सर्वव्यापी आहे.आणि ईश्वर एकच आहे. मग आपण का भेदभाव पाळायचा.आम्ही जातीभेद अजिबात पाळत नाही. ज्या दिवसापासून आम्ही घरात गौराई बसवतो तेव्हापासून आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडली नाही. अगदी आनंदाने व समाधानकारक जीवन व्यतीत करत आहोत. -आयुब बाबूलाल पठाण, सिंदखेड ता अक्कलकोट
गौराई आगमनवेळी आम्ही सर्व कुटूंब एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात.आमच्या कुटुंबात या वेळी खूप आनंदाचे वातावरण आहे. पाच पिढ्यापासून चालत आलेली ही परंपरा आजही निरंतर चालू आहे आणि पुढे ही चालू राहणार आहे. यात कधीही खंड पडू देणार नाही. गौराई अगमनावेळी आनंद होतो तर विसर्जनवेळी मनोमनी दुःख होतो. – आयेशाबी आयुब पठाण, सिंदखेड ता अक्कलकोट