तिघांचा मृत्यू- पंढरपूर रेल्वेस्थानकानजीक घडली घटना; छत्तीसगडवरून कामासाठी आलेल्या कामगारांवर काळाचा घाला
प्रतिनिधी / पंढरपूर
मिरजेकडून कुर्डुवाडीकडे जाणाऱया रेल्वेने चौघांना चिरडल्याने तिघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना पंढरपूर रेल्वे स्थानकानजीक बुधवार, 3 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. सकाळी या घटनेमुळे पंढरपूर परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत रेल्वे पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, बुधवारी पहाटेच्या सुमारास मिरजकडून कुर्डुवाडीकडे जाणाऱया कोण्या एका रेल्वे गाडीची पंढरपूर रेल्वेस्थानकानजीक चौघांना धडक बसली. यामध्ये दोघा जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जणाचा उपचारा दरम्यान दवाखान्यामध्ये मृत्यू झाला. तसेच एकजण जखमी झाला असून त्याला सोलापूर येथील दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये हेमंत गोविंद ठाकूर (वय 29), पंकज चरण भिवरी (वय 20), सोनु तुकाराम यादव (वय 18) अशी मयतांची नावे असून गोकूळ फुलसिंग भिवरी (वय 20) असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे.
हे चारही कामगार असून ते छत्तीसगड येथून कामासाठी पंढरपूरमध्ये आले होते. घटनेच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सापडल्या असल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे पोलिसांकडून या चार कामगारांची ओळख पटविण्यासाठी तपास केला तरी रात्री उशिरापर्यंत त्यांची ओळख पटली नव्हती. या घटनेचा अधिकचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत. सकाळच्या सुमारास ही घटना समजल्यानंतर शहरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.
त्या जखमी कामगाराकडूनच समजेल घटनेचा सारांश…
घटनेच्या ठिकाणी दारू बाटल्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे घटनेबाबत विविध तर्क विर्तक लढविले जात असले तरी घटना नेमकी कशी झाली याचा शोध लागला नाही. त्यामुळे घटनेतील चौथा कामगारच या घटनेचा खरा सारांश सांगू शकतो. त्यानंतरच या घटनेतील सत्य समोर येईल अशी चर्चा आज दिवसभर पंढरीमध्ये होत होती.