सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निद्रावस्थेमुळे ही आली वेळ; कोल्हापूर पद्धतीचे बांधारे बांधण्याची ग्रामस्थांची मागणी
अक्कलकोट प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. सर्वत्र नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहे. त्यातच हरणा नदीने सुद्धा रौद्ररूप धारण केले आहे. हरणा दुथडी भरून वाहत आहे. आज सर्वत्र आझादी का अमृत महोत्सव साजरा केला गेला. पण अक्कलकोट तालुक्यातील पितापूर मध्ये मात्र हरणा नदीत विदारक चित्र पाहायला मिळाले. दुथडी भरून वाहणाऱ्या हरणा नदीतून अंत्ययात्रा घेऊन जातानाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. मरणानंतरही शेवटचा प्रवाससुद्धा खडतर झाल्याचा प्रत्यय यावेळी आला. ही परिस्थिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अनास्थेमुळे झाली आहे अशी प्रतिक्रिया संतप्त पितापूरकर ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
तालुक्यातील पितापुर हे तीन हजार लोकवस्तीचे गाव हरणा नदीकाठी वसलेले आहे. या गावाला ज्या ज्या वेळी मोठा पाऊस पडतो. त्या त्या वेळी पुराच्या पाण्याने वेढा पडतो अशी परिस्थिती असताना, ग्रामस्थांच्या पुलाच्या मागणीकडे राजकिय नेत्यांनी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पुरपरिस्थितीत गावाला वेढा पडल्याने गावाबाहेर स्मशानभुमी असलेल्या मुस्लिम समाजासमोर अंत्यविधी कसा आणि कुठे करावा असा प्रश्न दरवर्षी पडतो.
अंत्यविधीसाठी नदी ओलांडून अकतनाळ हद्दीत असलेल्या कब्रस्तानमध्ये अंत्यविधी करावा लागतो. पावसामुळे सगळीकडे परिस्थिती बिघडलेली असताना ग्रामस्थांनी बोरी नदीतूनच्या पिंजऱ्याच्या खाली बॅरल बांधून हा मृतदेह नदी पार करून आणला आणि अंत्यसंस्कार केले. ज्यावेळी हे प्रेत पितापूरच्या बाजूने नदीच्या पलीकडे नेले जात होते त्यावेळी साधारण दीडशे ते दोनशे लोक नदी पलीकडे उभे होते. दुसरीकडे २५ ते ३० लोकांनी मात्र हा मृतदेह छातीपेक्षा जास्त पाण्यातून नदी पार करून अंत्यविधीसाठी दुसऱ्या काठावर नेण्यात आला.
हा प्रश्न जरी आज निर्माण झालेला
नसला तरी वर्षांनूवर्षापासून पितापूर ते अकतनाळ या दरम्यान पुलाची मागणी आहे परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे. या घटनेने हा प्रश्न पुन्हा एकदा पुलाचा प्रश्न अधोरेखित झाला असून प्रशासकीय व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान नूरअहमद शहासाब भंडारी यांचे निधन काल झाले होते. त्यावेळी तिथून आज सकाळी सातच्या वाजण्याच्या सुमाराला मृतदेह पितापूरच्या दिशेने येत होता. त्यावेळी देखील रस्त्याची मोठी अडचण झाली. गावाकडे येत असताना नन्हेगाव कट्याळ ओढ्याला पाणी आल्याने त्या ठिकाणी एक तास अम्ब्युलन्स थांबवावी लागली. इतकी अवहेलना मृत्यूनंतरही झाल्याने सर्वांना याचे वाईट वाटत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी तात्काळ गावाला भेट दिली असून ग्रामस्थांशी अडचणी विषयी चर्चा केली आहे.आणि हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत पितापूर ग्रामस्थांशी संवाद साधला असता ते असे म्हणाले की, २५ ते ३० वर्षांपूर्वी अशा प्रकारची घटना आमच्या गावामध्ये घडली होती तसाच प्रसंग आज घडला आहे. केवळ पूल नसल्याने आम्हाला या अडचणी येत आहेत प्रशासनाने लवकरात लवकर पूल मंजूर करून आम्हाला या समस्येतून मुक्त करावे,अशी मागणी त्यांनी केली आहे.