तातडीने दखल घेणार; मंत्री तानाजी सावंत यांचे आश्वासन
करमाळा/प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करून तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लावू असा विश्वास मंत्री तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आज विधानभवन मुंबई येथे करमाळ्यातील विविध प्रश्न संदर्भात मंत्री तानाजीराव सावंत यांना खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार नारायण पाटील, शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी निवेदन दिले.
करमाळा तालुक्यातील सरपडोह येथील हजारो एकर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वर्ग तीन ची नोंद प्रशासनाच्या चुकीमुळे लागली आहे, यामुळे या भागातील जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार बंद असून वाटप प्रक्रिया तसेच कर्ज मिळणे ही शेतकऱ्यांना दुरापास्त झाले आहे. गेली दहा ते पंधरा वर्षांपासून या भागातील हजारो शेतकरी आपल्या स्वतःच्या जमिनीवर स्वतःचे नाव लावण्यासाठी झगडत आहेत, मात्र त्यांना न्याय मिळत नाही. अशाच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील एका संपूर्ण गावावरून लावलेले वर्ग 3 चे नाव कमी करण्यात आले. मात्र करमाळा तालुक्यातील सरपडोह गावाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. या भागातील शेतकऱ्यांनी न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे, याबाबतची सर्व पुराव्यांशी निवेदन देण्यात आले.
कामोणे व देवळाली येथे जवळपास २०० घरकुल मंजूर झाले असून गावठाण व गायरानातील जमिनीवर वास्तव्यास असलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वन विभाग असा उल्लेख येत असल्यामुळे या भागातील गोरगरीब, दलित कुटुंबासाठी आलेल्या घरकुलाचा लाखो रुपयाचा निधी पडून आहे, यामुळे अनेक जण घरापासून वंचित आहेत.
मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पात समावेश करून दरवर्षी पावसाळ्यात कुकडी प्रकल्पातून अतिरिक्त पाणी उजनी धरणात सोडले जाते, हे पाणी पावसाळ्यातच मांगी तलावात सोडून पावसाळ्यातच तलाव भरून घ्यावा. तसेच कुकडी प्रकल्पात करमाळा तालुक्याचे तीन टीएमसी पाणी राखीव आहे. मात्र हे पाणी 279 किलोमीटरचा प्रवास करत येत असल्यामुळे करमाळ्यात पाणी पोहोचत नाही. पाण्याचा प्रवासादरम्यान पाण्याची अनेक ठिकाणी चोरी होते, यामुळे हे तीन टीएमसी पाणी कुकडी प्रकल्पातून थेट उजनी धरणात सोडावे व तेथे रिटेवाडी उपसा सिंचन योजना निर्माण करून रिटेवाडी येथील येथून पंप हाऊस च्या माध्यमातून पाणी उपसा करून विहाळ टेकडीवरील कॅनल मध्ये सोडून करमाळा तालुक्यातील जवळपास वीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणावी अशी मागणी करण्यात आली आहे. कुकडी प्रकल्पातील कॅनॉलसाठी जवळपास 300 कोटी रुपये खर्च करून सर्व कॅनाल तयार झालेले आहेत. फक्त यात पाणी सोडण्याची गरज आहे. यासाठी रिटेवाडी उपसासिंचन योजनेला मंजुरी द्यावी. या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यासाठी मंत्रालयात बैठक लावावी अशी मागणी निवेदनाद्वारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार नारायण पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली.
यावर तात्काळ मंत्री तानाजी सावंत यांनी या सर्व विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक लावण्या संदर्भात उचित कारवाई करण्याचे आदेश ओएसडी कृष्णा जाधव यांना दिले आहेत.