प्रतिनिधी / सोलापूर
अक्कलकोट रस्त्यालगत असणाऱया ग्रामोद्योग तेल घाण्याच्या मोकळ्या मैदानातून दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले. मंगळवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. पालकांची चिंता वाढविणाऱया घटनेने शहरात खळबळ उडाली असून मुले पळविणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
वर्षा सुनील काळे (वय दीड वर्ष) असे अपहृत मुलीचे नाव आहे. 31 ऑवटोबरपूर्वी काजल सुनील काळे (वय 28, रा. जमखंडी, राज्य कर्नाटक) ही मुलगी वर्षा हिला घेऊन सोलापुंरात आली होती. ती भिक्षेकरी असून बहिणीच्या मैत्रिणीच्या ओळखीने तिने तेल घाण्याच्या मोकळ्या जागेत मुक्कामाकरीता झोपडी उभारली होती. दिवसभर भिक्षा मागून रात्री ती झोपडीत मुक्काम करते. नेहमीप्रमाणे 31 ऑक्टोबरच्या रात्रीही काजल तेथे मुक्कामास होती. झोपडीच्या बाहेर ती स्वतः झोपी गेली, तर वर्षाला झोपडीत झोपी घातले होते. काजलला शिंदीचे व्यसन असून तिने त्या रात्रीही शिंदी प्राशन केली होती.
दरम्यान, मध्यरात्री एकच्या सुमारास नैसर्गिक विधीकरीता काजल उठली. त्यावेळी तिला मुलगी वर्षा दिसून आली नाही. घाबरलेल्या काजलने रात्री सारा परिसर धुंडाळून काढला. रस्त्यावरील प्रत्येकाला तिने वर्षाबाबत विचारले. परंतु वर्षा मिळून आली नाही. त्याच रात्री तिने पती सुनील यास फोन करून विचारणा केली. परंतु, त्याने वर्षाला नेले नसल्याचे सांगितले. तिचा संशय पती सुनीलवर होता. कारण सोलापुरात आल्यानंतर सुनीलने फोन करून वर्षाला नेणार असल्याचे काजलला सांगितले होते.
पोलिसांनी सोलापुरातल्या काजलच्या ओळखीच्या दोन व्यक्तींकडे चौकशी केली. तसेच काजलचे पती सुनीलकडेही चौकशी केली. परंतु त्यांनी वर्षाबाबतची माहिती नसल्याचे चौकशीवेळी सांगितले. एमआयडीसी पोलीस तेल घाण्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. शिवाय पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. या गुह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक वळसंगे करीत आहेत.