माऊलींच्या सोहळ्यातील धावा व भारूड उत्साहात
विवेक राऊत/ नातेपुते
सिंचन करिता मूळ । वृक्ष ओलावे सकळ ।।
नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरिं ।।.
पाणचोऱयाचें दार । वरिल दाटावें तें थोर ।।
वश झाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ।।
तुका म्हणे धावा । आहे पंढरी विसावा ।।
हा अभंग म्हणत एक एक दिंडी वाऱ्याच्या वेगाने पळत ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यातील धावा आज वेळापूर येथे झाला. त्यानंतर माऊलींच्या समोर शेंडगे दिंडी क्रमांक तीन दिंडीच्या वतीने मानाचे लक्ष्मण महाराज राजगुरू यांचे भारूड झाले.
खुडूस येथील रिंगण सोहळ्यानंतर माऊलींची पालखी निमगाव पाटी येथे दुपारच्या विश्रांतीसाठी विसावली.
संत तुकाराम महाराजांना पंढरपूरला जात असताना वारीच्या वाटेवर वेळापूर येथे विठ्ठल मंदिराचा कळस दिसला होता. विठूरायाच्या दर्शनाच्या ओढीने महाराज बेभान होऊन धावत निघाले. त्याप्रसंगाचे स्मरण म्हणून दरवषी वेळापूर येथे धावा केला जातो.
चोपदारांनी एक एक दिंडी सोडली. त्यानंतर माऊलींचा रथही त्याच गतीने पुढे गेला तेव्हा दिंडीत तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा हा अभंग म्हणण्याचा प्रघात आहे.
वेळापूर नजीक सर्व दिंडय़ांमधून भारुडे सुरू होती. माऊलींच्या समोर प्रसिद्ध भारुडकार लक्ष्मण महाराज राजगुरू यांचे भारूड झाले. एकनाथ महाराजांचा सखे तुला बुरगुंडा होईल, नवरा नको गं बाई, वेडी झाली वेडी अशी अनेक एकनाथ महाराजांची भारुडे झाली. विविध भारुडे ऐकताना वारकरी हसून हसून पुरेवाट झाले होते.
भारुडानंतर सोहळा समाज आरतीनंतर वेळापूर येथे विसावला.