पालकमंत्र्यांना शेतकरी-शहर म. ए. समितीचे निवेदन
बेळगाव : बळ्ळारी नाल्यासंदर्भात वडगाव येथील शेतकरी व म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या भेडसावत आहे. तेव्हा तातडीने समस्या सोडवा, असे गाऱ्हाणे पालकमंत्र्यांकडे घालण्यात आले. जोरदार पावसामुळे बळ्ळारी नाल्याच्या परिसरातील शिवाराला पूर आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षीच नुकसान होत आहे. तेव्हा बळ्ळारी नाल्याची खोदाई करावी आणि कायमस्वरुपी समस्या सोडवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण-पाटील, अमोल देसाई, कीर्तीकुमार कुलकर्णी, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, सागर पाटील, राजू मरवे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.