जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
अल्पसंख्याकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांना असलेल्या योजनांसंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीने अल्पसंख्याकांची बैठक जिल्हाधिकाऱयांनी घ्यावी. यासह इतर मागण्यांसाठी बेळगाव ग्रामीण काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक घटक यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरापासून तसेच कोरोना काळात अल्पसंख्याकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारचे अनुदान योग्यप्रकारे मिळत नाही. 2019 मध्ये आलेल्या पुरामुळे अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतकऱयांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे सर्वजण अडचणीत आहेत.
अल्पसंख्याकांनी या अडचणींमुळे अनेक बँकांमधून कर्जे काढली आहेत. ती कर्जे परतफेड करणे अवघड आहे.
त्यासाठी तातडीने ती कर्जे माफ करावीत, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहेत. अनेक राष्ट्रीयकृत बँका तसेच सोसायटय़ांमधूनही कर्ज काढले आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली अल्पसंख्याक वावरत आहे. तेंव्हा तातडीने हे ओझे कमी करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी इम्रान तपकीर, तबसू मुल्ला, अक्षर सडेकर, विकी सिंग, हाजीमुरा गोरीखान, खादीर शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.