पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा : राजस्थानात अनेक विकामकामांचा शुभारंभ
► वृत्तसंस्था/ जयपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वाराचा दौरा करत 5500 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन अन् कार्यारंभ केला आहे. नाथद्वारा येथे मोदींनी रोड शोत देखील भाग घेतला आणि त्यानंतर श्रीनाथजी मंदिरात जात पूजा केली आहे. यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी विरोधकांवर विशेषकरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नकारात्मक विचारसरणीमुळे काही लोकांना देशात काहीच चांगले घडताना दिसून येत नाही. अशाप्रकारच्या लोकांना केवळ वाद निर्माण करणे पसंत असल्याची टीका मोदींनी केली आहे.
पूर्वीच्या शासनकाळात पुरेशा प्रमाणात वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना झाली असती तर आता आम्हाला डॉक्टरांच्या कमतरतेला तोंड द्यावे लागले नसते. प्रत्येक घराला पाणी मिळाले असते तर आम्हाला 3.5 लाख कोटी रुपयांची जलजीवन मिशन सुरू करावी लागली नसती. काही जण ‘आटा पहले या डाटा पहले’ अशाप्रकारचा युक्तिवाद करायचे. परंतु जलद विकासासाठी पायाभूत सुविधांसोबत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरही आवश्यक आहे. भारत सरकार सेवाभावनेला भक्ती भाव मानून दिवसरात्र काम करत आहे. जनता-जनार्दनाचे जीवन सुलभ करण्यास आमच्या सरकारच्या सुशासनाची प्राथमिकता आहे. प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, सुविधा आणि सुरक्षेचा विस्तार व्हावा म्हणून निरंतर काम केले जात असल्याचा दावा मोदींनी केले आहे.
आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर शहरे आणि गावांमध्ये संपर्कयंत्रणा वाढविते. आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर समाजात सुविधा वाढवून समाजाला जोडते. आधुनि इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल सुविधा वाढवून विकासाला वेग देते. राष्ट्ररक्षणासाठी महाराणा प्रताप यांचे शौर्य, भामाशाह यांचे समर्पण आणि वीर पन्नाधाय यांच्या त्यागाच्या गाथा या भूमीच्या कणाकणात सामावल्या गेल्या आहेत. स्वत:च्या वारशाचे हे भांडवल आम्हाला अधिकाधिक भागापर्यंत नेणे आवश्यक आहे. याचमुळे केंद्र सरकार ऐतिहासिक वारसा जगापर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या सर्किटवर काम करत असल्याचे मोदी म्हणाले.
नकारात्मकतेने व्यापून गेलेल्या लोकांमध्ये दुरदृष्टी नसते तसेच ते राजकीय स्वार्थ बाजूला सारू शकत नाहीत. दुरदृष्टी ठेवून पायाभूत विकास न घडविण्यात आल्याने राजस्थानने मोठे नुकसान सहन केले असल्याचे मोदींनी म्हटले आहे. तर भाषणाच्या प्रारंभी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री गेहलोत यांना माझे मित्र असे संबोधिले. राजस्थान देशातील सर्वात मोठे राज्य आहे, राजस्थानच्या विकासाने देशाचाही विकास होणार असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. तर गेहलोत यांनी आम्ही शत्रू नसून केवळ विचारांची लढाई असल्याचे म्हणत प्रतिसाद दिला आहे.
हे कशाप्रकारचे सरकार?
पंतप्रधान मोदींनी यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यातील राजकीय संघर्षावर अप्रत्यक्ष टिप्पणी केली आहे. हे कसले सरकार आहे, जेथे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना स्वत:च्या पक्षाच्या आमदारांवरच विश्वास नाही? सरकारमध्ये परस्परांना अपमानित करण्याची स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्रिपद पूर्ण 5 वर्षे संकटात असताना राजस्थानच्या विकासाची पर्वा कुणाला असणार अशी प्रश्नार्थक टिप्पणी मोदींनी केली आहे.