शाळांना सुटी अन् पावसाची उघडीप : विद्यार्थी आनंदित, बळ्ळारी नाल्याला मात्र अजूनही पूर, पिके पाण्याखालीच
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. सलग पाऊस पडत असल्यामुळे साऱयांनाच मरगळ आली होती. मात्र, शुक्रवारी पावसाने काहीशी उघडीप दिली आणि सूर्यप्रकाश पडला. यामुळे काहीसा दिलासा मिळाला.
यावषी मान्सूनचे उशिरा आगमन झाले. पाऊस पडेल की नाही, याची धाकधूक लागली होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून दमदार पाऊस कोसळल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने बऱयापैकी उघडीप दिली आहे. अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी पावसानंतर सूर्यकिरणे पडत होती. त्यामुळे आलेला पूर काही प्रमाणात ओसरला आहे.
या पावसामुळे वडगाव, आनंदनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले होते. येळ्ळूरच्या रस्त्यावरही पाणी साचून होते. मात्र, गुरुवारी रात्रीपासूनच पावसाने काहीशी उसंत घेतली. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
दोन दिवस जोरदार पाऊस झाल्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी शाळांना सुटी जाहीर केली. मात्र, सुटी जाहीर केल्यानंतर पावसाचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे पावसाच्यावेळी सुटी नाही आणि उघडीप पडल्यानंतर सुटी मिळाली, यामुळे विद्यार्थीही आपल्या खेळांमध्ये गर्क झाले होते. सुटीचा आनंद आणि पावसाची विश्रांती यामुळे साऱयांच्या चेहऱयावर आनंद दिसत होता.
बळ्ळारी नाल्याला मात्र अजूनही पूर आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पुलावरील मूस कचऱयाने बुजली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे अवघड झाले आहे. येडियुराप्पा मार्गावरील पुलामध्येही कचरा साचून आहे. बेळगाव-बागलकोट रोडवरील कुडची पुलाजवळदेखील कचरा साचला आहे. याचबरोबर बळ्ळारी नाल्यामध्ये जलपर्णी आणि झाडेझुडुपे वाढल्यामुळे पाणी पुढे जात नाही. त्यामुळे हा पूर तसाच असून भातपीक वाया जाणार आहे.
आणखी पाऊस झाल्यास गंभीर परिस्थिती
बळ्ळारी नाला परिसरातील जवळपास दोन हजार एकरमधील भातपीक पाण्याखाली गेले आहे. आता पाऊस कमी झाला आहे. मात्र, हा पूर ओसरण्यास किमान आठ दिवस लागणार आहेत. यातच आणखी पाऊस झाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. पाऊस कमी झाला असला तरी रात्रीपासून वारे मात्र जोराने वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडेदेखील कोसळली.
सायंकाळी मात्र पुन्हा पावसाला जोर
दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. काहीवेळ शिडकावा झाला. मात्र, सायंकाळी 5.30 च्या दरम्यान पुन्हा पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. त्यामुळे शहरातील भाजीविपेते यांच्यासह फेरीवाले व खरेदीदारांची चांगलीच तारांबळ उडाली. भरपावसात छत्री हातात घेत खरेदीदारांना खरेदी करावी लागत होती.