आरती प्रभू यांची एक अत्यंत अर्थगर्भ कविता आम्हाला दहावीच्या अभ्यासक्रमात होती. अभ्यासमंडळाचं नक्की काय बिनसलं कोण जाणे, पण ती कविता अभ्यासक्रमातून वगळण्यात आली. आरती प्रभू यांची लेखनशैली बरीच गूढ, कवितांच्या ओळी म्हणजे अनवट रागांच्या वेगळय़ा वळणाच्या सुरावटींसारख्या समोर येतात.
मृत्यूत कोणि हासे, मृत्यूस कोणि हसतो
कोणी हसून मरतो, मरत्यास कोणि हसतो
अशा त्या ओळी. खरं तर पुस्तकात छापलेल्या त्या ओळी! त्याला चाल लावली होती का तेही माहित नाही. पण ‘मृत्यू’ या संकल्पनेतच अंतर्भूत असणारं एक प्रकारचं औदासिन्य, एक पोकळी, माणसांचे स्वभाव, हे सगळं सगळं त्या दोन ओळीतून प्रकट होतं. एका आजींना गाण्याची फार आवड होती. त्या काळात खेडेगावात गरत्या बायकांनी गाणं शिकणं जवळपास निषिद्ध! स्वप्न पाहणंही दुरापास्त! एकत्र शेतकरी कुटुंबाचा गाडा ओढओढूनच त्यांचं आयुष्य खपलं. शेवटीही कर्करोगानं त्यांना ग्रासलं. तर त्यांनी आपल्या मुलांना जवळ बोलावलं आणि सांगितलं. ‘आता माझे थोडेच दिवस उरलेत. मग बोलता येणार नाही. म्हणून आताच सांगते. शेवटी मला ‘जाऊ देवाचिया गावा’ हा अभंग म्हणत म्हणत न्या हं! विसरू नका.’ येणारे कढ आवरत, डोळे टिपत मुलांनी त्यांना वचन दिलं आणि ते पाळलं. हिऱयासारखा लखलखता सूर, भारतीय संगीत क्षेत्रातलं सोन्याचं पिंपळपान म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या केसरबाई केरकर यांनी त्यांच्या अखेरच्या काळात डॉक्टरांना सांगितलं होतं की, ‘मला थोडीशी तरी बरी करा, चांगलं गाऊनच दाखवते.’ पुलंनी लिहिलेल्या त्यांच्या व्यक्तिचित्रणात याचा उल्लेख आहे. असं काहीतरी वाचलं किंवा ऐकलं की प्रश्न पडतो की मृत्यू म्हणजे कोणासाठी नक्की काय असेल?
सलील कुलकर्णींनी गायलेलं अत्यंत प्रसिद्ध गीत जे सोन्याची…हो..सोन्याचीच लेखणी घेऊन आलेल्या बोरकर नामक जादूगाराने लिहिलं आहे.
संधिप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
असावीस पास जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविण
मृत्यू इतका सुंदर दिसतो? की कलाकारांना, लेखकांनाच तो इतका सुंदर दिसतो? मृत्यूचं भय कमी होण्यासाठी अशी सुंदर सुंदर गाणी उपयोगी पडतील का हो? पुन्हा एकदा मृत्यू आणि प्रश्न! गाणं, मृत्यू आणि इच्छा यांचा तिपेडी गोफ विणत राहतो. आरती प्रभूंच्या अशाच आणखी एका गाण्यात मृत्यूविषयीच, पण अधिक सूचक, साक्षेपी लिहिलंय..
तेव्हा मलाच माझा, वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी, जाईन दूर गावा.
पाण्यात ओंजळीच्या यावा चुकून मीन
चमकून हो तसाच, गाण्यात अर्थ जावा.
तारांवरी पडावा, केव्हा चुकून हात
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.
वस्तुतः ही गजल! पण प्रत्येक शेर म्हणजे स्वतंत्र कविता तर आहेच, पण त्याचबरोबर अर्थाच्या दृष्टीने एक सलगता या ओळींतून आढळते. इथेही दूरचं गाव म्हणजे मृत्यूच! वाहतं पाणी सहज ओंजळीत घेतल्यावर अगदी योगायोगाने त्यात छोटीशी मासोळी यावी तितक्मयाच दुर्मिळ सहजतेने गाण्यात अर्थ चमकून जावा असं कवी म्हणून जातो. चमकून जाणं हे विजेच्या बाबतीत घडतं. ‘तारांवरी पडावा केव्हा चुकून हात’ या ओळी तर ग्रेट! स्वराला लांबी रुंदी खोली असते याची खोलवर जाणीव कवीला आहे. ‘विस्तीर्ण पोकळीचा गंधार’ ही कल्पना विलक्षण आहे. तानपुरा उत्तम रीतीने जुळल्यावर त्यातून स्वयंभू गंधार प्रकट होतो. स्व. लता मंगेशकर यांच्या गळय़ात तो? स्वयंभू गंधार होता असं त्यांचे वडील म्हणत असत. हे सगळं सगळं ऐन मृत्यूच्या छायेत का बरं असावं? मृत्यूवर कविता लिहिताना इतके आनंदसोहळे का बरं सुचावेत? काय आहे हे गौडबंगाल?
संतांना या मृत्यूचं कारण, परिणाम आणि त्यातला आनंदाचा भाग कळला होता. म्हणून की काय तुकोबा
काळ देहासि आला खाऊ
आम्ही आनंदें नाचू गाऊ
असं म्हणायचे की काय? आणि इथेही गाणं आहेच.
टाळ मृदुंग दक्षिणेकडे
माझे गाणे पश्चिमेकडे
चक्क असं म्हटलंय तुकोबारायांनी! कारण दक्षिण ही यमराजाची तर पश्चिम ही मुक्तीची दिशा मानली जाते. आणि गाणं आणि मुक्ती यांचं अतूट नातं आहे. ‘नामसंकीर्तन साधन पै सोपे’! आणि तेही संकीर्तन म्हटलंय. नुसतं नाव घेणं नव्हे तर नाम गाणं हे आहे. आपल्याला वाटतं की ‘गाता गाता जाईन मी’ हे हल्लीचं आहे. पण या शब्दांच्या पाठीमागे असलेला आशय खूप जुना आहे. गायक किंवा कोणताही कलाकार हा अखंड रियाज करत असतो. इतका, की अखेरच्या क्षणीही त्याच्या मनात गाणं आणि गाणंच रहातं किंवा त्याची कलाच रहाते. मृत्यू या संकल्पनेची भीती कमी होते आणि फारच.
‘हॉस्पिस’ नावाच्या एका पाश्चात्य संकल्पनेविषयी माझ्या वाचनात आलं. हा शब्द हॉस्पिटल या शब्दाशी साधर्म्य दर्शवतो. ज्यांचा मृत्यू होणार हे निश्चित आहे, जो कोणत्याही प्रयत्नांनी वाचू शकत नाही अशांना त्यांच्या इच्छेनुसार अशा हॉस्पिसमध्ये ठेवलं जातं. अशा रुग्णाचे शेवटचे दिवस शांतपणे, सुखात आणि शक्मय तितके वेदनारहित जावेत आणि समदुःखी लोकांच्या सहवासात त्यांना आपल्या दुःखाचा विसर पडावा असंच तिथलं वातावरण असतं. तिथला स्टाफही त्या दृष्टीने प्रशिक्षित असतो. विशेष म्हणजे रुग्णांच्या मनाला शांती मिळेल आणि त्यांना आराम पडेल असं मंद सुश्राव्य संगीत तिथं सुरू असतं. तिथे मुक्कामाला आलेल्या बहुतांश रुग्णांना आपला मृत्यू निश्चित आहे आणि तो पावलापावलाने जवळ जवळ येत आहे हे कळलेलं असतं. अपवाद म्हणजे काही लहान दुर्दैवी मुलं! खास लहान मुलांसाठी म्हणून वेगळं संगीत असतं. त्या निरागस छोटय़ांना संगीताच्या तालावर बागडताना पाहून त्यांच्या आईवडिलांच्या गळय़ाशी आवंढा येत असेल. ‘मला माहित आहे की मी देवबाप्पाकडे जाणार आहे. पण मला खूप आनंद होतोय कारण मला तिथे आपली आई भेटेल. तू रडू नकोस.’ रडणाऱया बापाचे अश्रू पुसत ती त्याला सांगते, ‘पपा तू रडू नकोस. जिथे जिथे तू कॉन्सर्ट करशील त्या त्या गाण्यात मीच असेन. आणि सांगू? मी देवबाप्पाकडे जायला निघाले की माझा हात हातात घेऊन एक गाणं म्हण. मी ते ऐकत ऐकत जाईन. म्हणजे मला त्रास होणार नाही.’ मायकेल गिटारवर धून छेडत असतानाच त्या मुलीचा शेवट होतो अशी ती कथा होती. ‘म्युझिक ऑफ सोल’ नावाची. मुलीच्या चेहऱयावर अंतिम क्षणी पसरलेलं सुखाचं हास्य आणि वातावरणात भरून राहिलेलं संगीत!
गाता गाता जाईन मी
जाता जाता गाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहिन मी
माझे जगणे होते गाणे
या ओळी दुसरं काय म्हणतात? अखेरपर्यंत गायचं आहे आणि गाणंच व्हायचं आहे हेच म्हणतात. शांता शेळके यांच्या सर्वोत्तम गीतांपैकी असलेलं एक गीत आठवतं
असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे
मृत्यूचा सोहळा करणारं, गळून जाण्याचा उत्सव करणारं मृत्यूलाही हसवणारं आणि मरणाऱयालाही हलकेच उचलून न्यायला लावणारं असं हे गाणं..
– ऍड. अपर्णा परांजपे प्रभु