80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम खानने ‘विजय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. परंतु तिला खरी ओळख ‘त्रिदेव’ चित्रपटामुळे मिळाली आणि याच चित्रपटातील गाणे ‘ओए ओए…तिरछी टोपी वाले’ हे प्रचंड गाजले होते. सोनमने 1989 मध्ये ‘त्रिदेव’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव राय यांच्यासोबत विवाह केल्यावर चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले होते. आता सुमारे 3 दशकांनी सोनम पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार आहे.
अत्यंत कमी वयात मी चित्रपटांमध्ये काम करणे थांबविले होते, विवाह तसेच वैयक्तिक कारणांमुळे मला भारत सोडावा लागला होता असे सोनमने म्हटले आहे. अंडरवर्ल्डशी निगडित लोकांकडून पतीला धमकी मिळाल्यावर सोनमचे कुटुंब विदेशात स्थलांतरित झाले होते. सोनम प्रथम लॉस एंजिलिस आणि मग स्वीत्झर्लंडमध्ये राहत होती. परंतु 2016 मध्ये ती पती राजीव रायपासून विभक्त झाली. वयाच्या सतराव्या वर्षी मी चित्रपटांमध्ये काम करणे थांबविले होते, त्यावेळी या निर्णयाचे परिणाम समजून घेण्यास मी परिपक्व नव्हते असे सोनमचे म्हणणे आहे. बॉलिवूडमध्ये मला मोठे समर्थन दिले आहे. बॉलिवूडमध्ये परतत पुन्हा नाव कमाविण्याचा माझा विचार आहे. आता नव्या लोकांना भेटत काम करू इच्छिते. बॉलिवूडच्या संपर्कात नव्हते याचीच केवळ मला खंत आहे. ऋषी कपूर यांनीच माझी यश चोप्रा यांच्याशी भेट घडवून दिली होती. याचमुळे मी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेऊ शकले होते. आता अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज आणि नीरज पांडे यांच्यासारख्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची योजना आहे. तसेच ओटीटीवरही काम करण्याचा विचार असल्याचे सोनमने म्हटले आहे.