पक्षाच्या रायपूर येथील अधिवेशनात महत्त्वाचे वक्तव्य ः कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याबाबत समाधानाची भावना व्यक्त
वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगडमधील रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या 85 व्या अधिवेशनात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत दिले. अधिवेशनाला संबोधित करताना ‘भारत जोडो यात्रेतील सहभागानंतर आपला राजकीय प्रवास संपला याचा मला आनंद आहे. हा टप्पा काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरला’, असे भाष्य त्यांनी केले. भाषणादरम्यान सोनियांनी आपला राजकीय अनुभव सांगण्यासोबतच मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोलही चढवला.
छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या 85 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱया दिवशी शनिवारी माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे भाषण मुख्य आकर्षण होते. देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी या आता 78 वर्षांच्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या तब्येतीत चढ-उतार सुरू आहेत. अशा स्थितीत सोनियांची राजकीय सक्रियता कमी झाली आहे. प्रकृती अत्यवस्थ असतानाही त्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी त्या शुक्रवारीच राहुल गांधी यांच्यासह कार्यक्रमस्थळी दाखल झाल्या होत्या. आता रविवारी राहुल गांधी यांचे भाषण होणार असून दुपारच्या सत्रात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संबोधनाने अधिवेशनाचा समारोप होईल. अधिवेशनासाठी काँग्रेसचे सर्व बडे नेते रायपूरमध्ये एकवटले आहेत.
सोनिया गांधी अधिवेशनातील भाषणात आपल्या राजकीय कारकिर्दीतील विविध घटनांचा परामर्ष घेतला. 2004 आणि 2009 मध्ये आमच्या विजयांसोबतच डॉ. मनमोहन सिंग यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मला वैयक्तिक समाधान मिळाले. यासाठी मला कार्यकर्त्यांचे पूर्ण सहकार्य लाभले, असे त्या म्हणाल्या. तसेच पक्षाध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून आलेल्या चढ-उतारांबाबत सोनियांनी पहिल्यांदाच भाष्य केले. 1998 मध्ये आपण पहिल्यांदा पक्षाध्यक्ष झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या 25 वर्षांत अनेक चांगले आणि काही वाईट अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षपदाच्या अनुभवावर सोनिया यांनी हे वक्तव्य केले आहे. 2004 आणि 2009 मध्ये सोनियांच्या नेतृत्वाखाली केंद्रात युपीए सरकार स्थापन झाले होते.
भाजप-आरएसएसकडून संस्थांचे उद्ध्वस्तीकरण
सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, देश आणि काँग्रेससाठी हा आव्हानात्मक काळ आहे. भाजप आणि आरएसएसने देशातील प्रत्येक संस्था ताब्यात घेऊन उद्ध्वस्त केली आहे. त्यातून काही व्यावसायिकांना फायदा करून दिल्याने अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचला आहे. याविरोधात संपूर्ण देशाला लढा द्यावा लागेल. या प्रतिकूल काळात भारत जोडो यात्रा आशेचा किरण म्हणून उदयास आली आहे, असे नमूद करत अप्रत्यक्षपणे पुत्र राहुल गांधी यांच्या पुढाकाराचे कौतुक केले.
देशात द्वेषाचे वातावरण ः खर्गे
काँग्रेसच्या अधिवेशनात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, देशात द्वेषाचे वातावरण आहे. देश आणि काँग्रेससाठी हा आव्हानाचा काळ आहे. सरकार रेल्वे, जेल, तेल सर्वकाही आपल्या मित्रांना विकत आहे. दिल्ली सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा डीएनए गरीबविरोधी असल्याचा चिमटाही त्यांनी काढला. भारत जोडो यात्रेबाबत बोलताना त्यांनी राहुल गांधींनी खडतर प्रवास पूर्ण केल्याचे स्पष्ट केले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीवरही चर्चा
पक्षाच्या अधिवेशनात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त विरोधी पक्षाबाबतही चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी संपूर्ण विरोधकांना एका व्यासपीठावर यावे लागेल, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. विरोधी पक्षांनी तिसऱया आघाडीपासून अलिप्त राहायला हवे. उलट असा निर्णय भाजपलाच बळ देतो, असेही मत काही नेत्यांनी व्यक्त केले.