लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा करणार
वृत्तसंस्था/ अमेठी
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला राजकीय आघाडीवर आणखी एक झटका बसण्याची चिन्हे आहेत. याचे थेट संकेत उत्तरप्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाच्या सक्रीयतेतून मिळत आहेत. पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अमेठी मतदारसंघात पक्षाचा उमेदवार उभा करण्याची तयारी चालविली आहे. मागील 4 लोकसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाने या मतदारसंघात स्वतःचा उमेदवार उभा केला होता. यामागे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची उमेदवारी कारणीभूत होती. मागील लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना पराभूत करत भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले होते.
अखिलेश यादव यांनी अलिकडेच अमेठीचा दौरा केला आहे. या मतदारसंघातील महिलांची स्थिती दयनीय आहे, अनेक व्हीआयपी नेते या मतदारसंघातून जिंकत राहिले आहेत. तरीही या मतदारसंघाचा विकास झालेला नाही, मग उर्वरित राज्याबद्दल न बोलणंच बरं. पुढील निवडणुकीत अमेठीचे लोक मोठय़ा नेत्याला नव्हे तर मोठे मन असलेल्याला निवडून आणतील. समाजवादी पक्ष अमेठीमधून गरीबी हटविण्याची शपथ घेत असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने गमावला बालेकिल्ला
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी पराभूत केले होते. परंतु राहुल हे केरळच्या वायनाड मतदारसंघातून विजयी होत लोकसभेत पोहोचले होते. काँग्रेसने मागील वेळी अमेठी मतदारसंघ गमावला असल्याने यावेळी आता काँग्रेस येथे स्पर्धेत नाही. या मतदारसंघात आता भाजपला पराभूत करावे लागणार असल्याचे समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे.
काँग्रेसपासून अंतर राखण्याचे धोरण
काँग्रेस किंवा बहुजन समाज पक्षासोबत आगामी लोकसभा निवडणुकीकरता आघाडी करणार नसल्याचे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले आहे. 2024 ची निवडणूक समाजवादी पक्ष काही घटक पक्षांसोबत मिळून लढणार असल्याचे अखिलेश यांनी अमेठी दौऱयावेळी म्हटले आहे. समाजवादी पक्षाची सध्या राष्ट्रीय लोकदलासोबत आघाडी आहे. पक्षाने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ रायबरेलीविषयी मात्र अद्याप कुठलाच निर्णय घेतलेला नाही.
मतदारसंघाची पार्श्वभूमी
समाजवादी पक्षाने 1999 मध्ये अमेठी मतदारसंघात स्वतःचा उमेदवार उभा केला होता. त्यावेळी सोनिया गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढवत होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला 67 टक्के मते मिळाली होती. तर सप उमेदवार कुमारुज्जमा फौजी यांना 2.67 टक्के मतेच प्राप्त झाली होती. त्यानंतर 2004 मध्ये समाजवादी पक्षाने राहुल गांधी यांना वॉकओव्हर दिला होत. परंतु तेव्हा सपने रायबरेलीत सोनिया गांधींच्या विरोधात उमेदवार उभा केला होता. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत सपने अमेठी तसेच रायबरेलीत स्वतःचा उमेदवार उभा केलेला नव्हता.