विविध पक्षांमधील नाराज नेत्यांशी साधणार संपर्क
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीकरता मंगळवारी भाजपची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत पक्षातील नाराज नेत्यांसंबंधी विचारविनिमय करण्यात आला आहे. पक्षाने लोकसभा निवडणुकीकरता एक समिती स्थापन केली आहे. ही समिती विविध पक्षांमधील नाराज नेत्यांशी संपर्क साधून त्यांचा भाजपप्रवेश घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.
या समितीचे मुख्य काम विविध राजकीय पक्षांमधील असंतुष्ट नेत्यांशी संपर्क साधणे आणि त्यांना पक्षात सामील करणे असणार आहे. याचबरोबर या समितीच्या मंजुरीनंतरच कुठल्याही नेत्याचा भाजपमधील अधिकृत प्रवेश शक्य होणार आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, महासचिव तरुण चुघ, महासचिव सुनील बन्सल आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी भाग घेतला आहे. बैठकीचे अध्यक्षत्व जगतप्रकाश न•ा यांनी केले असून राज्यांमधील भाजप पदाधिकारीही यात सामील झाले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वत:च्या पक्षात नाराज असलेल्या नेत्यांना पुन्हा सक्रीय करण्याचा प्रयत्न या समितीकडून केला जाणार आहे. समिती प्रत्येक नेत्याशी संवाद साधून त्याच्या नाराजीचे कारण जाणून घेणार आहे. तसेच हे कारण दूर करत असंतुष्ट नेत्यांना पक्षात पुन्हा सन्मान दिला जाणार आहे.
अयोध्या कार्यक्रमावर रणनीति
अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंबंधी देखील भाजपची बैठक झाली आहे. यात कार्यक्रमाच्या रणनीतिला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. भगवान रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी देशभरातील लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्याची रुपरेषा निश्चित करण्यात आली आहे. राम मंदिर आंदोलन आणि मंदिर उभारणीतील पक्षाच्या भूमिकेसंबंधी एक पुस्तिका तयार केली जाणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी नवमतदारांशी जोडून घेण्यासाठी बूथ पातळीवर कार्यक्रमही आयोजित केले जातील. विरोधी पक्षांनी मंदिर उभारणीत कशाप्रकारे अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता यावर भाजपकडून प्रकाशझोत टाकला जाणार आहे. भाजपने राम मंदिराशी निगडित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेकडून आयोजित सर्व कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचे आणि समर्थन देण्याचे आश्वासन दिले आहे.
अबकी बार 400 पार, तिसरी बार मोदी सरकार लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा नवा नारा
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नवा नारा निश्चित केला आहे. हा नारा ‘अबकी बार 400 पार, तिसरी बार मोदी सरकार’ असा असणार आहे. तसेच भाजपने राज्य, लोकसभा अन् विधानसभा मतदारसंघ स्तरावर संयोजक आणि सह-संयोजक निश्चित केले आहेत. लवकरच देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांचे दौरे होणार आहेत. पंतप्रधान मोदी हे 22 जानेवारीनंतर प्रत्येक राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘अच्छे दिन आने वाले है’ असा नारा दिला होता. तर पक्षाने 2019 च्या निवडणुकीत ‘फिर एक बार मोदी सरकार’ असा नारा दिला होता. दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मोठा विजय मिळवत स्वबळावर बहुमत प्राप्त केले होते.