दिवाळीसाठी विशेष रेल्वे सोडण्याच्या निर्णयामुळे प्रवाशातून समाधान
प्रतिनिधी / बेळगाव
दिवाळीमध्ये बेंगळूर-बेळगाव, मुंबई-बेळगाव या मार्गावरील सर्वच रेल्वेंचे बुकिंग फुल्ल झाले आहे. यामुळे या मार्गांवर विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली असून, नैर्त्रुत्य रेल्वेने दि. 21, 22 व 26 ऑक्टोबर रोजी दिवाळीसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यशवंतपूर-बेळगाव-यशवंतपूर या मार्गावर विशेष रेल्वे धावणार आहे. यशवंतपूर-बेळगाव (06505) ही एक्स्प्रेस शुक्रवार दि. 21 रोजी रात्री 11.30 वा. यशवंतपूर येथून निघणार असून शनिवारी सकाळी 9.25 वा. बेळगावला पोहोचणार आहे. तर बेळगाव-यशवंतपूर (06506) ही एक्स्प्रेस दि. 22 रोजी सकाळी 11.10 वा. बेळगावमधून निघणार असून रात्री 10 वा. यशवंतपूरला पोहोचेल.
दिवाळी संपल्यानंतर म्हणजेच परतीच्या प्रवासासाठी बुधवार दि. 26 रोजी बेळगाव-यशवंतपूर (07305) या मार्गावर विशेष रेल्वे धावणार आहे. ही एक्स्प्रेस रात्री 10 वा. बेळगावमधून निघणार असून सकाळी 8.50 वा. यशवंतपूर येथे पोहोचणार आहे.
तरुण भारतच्या वृत्ताची दखल…
रेल्वे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून अनेक प्रवाशी तात्कालमध्ये बुकिंग करत आहेत. त्यामुळे मुंबई-बेळगाव व बेंगळूर-बेळगाव या मार्गांवर विशेष रेल्वे सोडावी, असे वृत्त तरुण भारतमधून बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले होते. या बातमीची दखल घेऊन नैर्त्रुत्य रेल्वेने बेंगळूर-बेळगाव-बेंगळूर या मार्गावर विशेष रेल्वे सुरू केल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.