खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजप, मनसेला टोला
प्रतिनिधी/ कराड
महागाईने जनता होरपळत असताना त्यावर उपाययोजना करायच्या सोडून केवळ काही नेते भाषणे करुन सामाजिक तेढ वाढवत आहेत. उपाशीपोटी केवळ भाषणे ऐकून जनतेचे पोट भरणार नाही. त्यामुळे भाषणबाजीने तेढ निर्माण करण्यापेक्षा विरोधकांनी महागाईवर बोलते व्हावे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा व मनसेला लगावला.
शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे कराड येथे आल्या होत्या. त्यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, सारंग पाटील, लोकशाही आघाडीचे नेते जयंतकाका पाटील, युवा नेते सौरभ पाटील, माई साळुंखे, जयंत बेडेकर, मलकापूरचे प्रमोद शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे समाधीस्थळ हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. दरवर्षी आम्ही समाधीस्थळासह विरंगुळा निवासस्थानाला भेट देऊन पाहणी करत असतो. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही राजकारण, समाजकारणात सक्रिय आहोत. स्व. चव्हाण साहेबांवरही नाहक आरोप झाले होते मात्र त्या आरोपांना त्यांनी संयमाने प्रतिउत्तर दिले होते. आज शरद पवार साहेबांसह वैयक्तिक माझ्यावर विरोधकांकडून टीका केली जाते. मात्र आम्ही टिकेला फारसे गांभीर्याने घेत नाही कारण आमच्यापुढे महागाईचा प्रश्न कसा सोडवायचा हा विषय आहे. यासाठी दिल्लीत पवार साहेबांसह आम्ही सर्व महाविकास आघाडीचे खासदार आवाज उठवत आहोत.
जेठली, सुषमा स्वराज यांची आठवण
खासदार सुळे म्हणाल्या, युपीए सरकारच्या काळात आत्ता आहे, त्यापेक्षा महागाई कमी होती. तरीही तेव्हा संसंदेत स्व. अरुण जेटली, स्व. सुषमा स्वराज या नेहमी सरकारला महागाईवरून सुनावत असत. आम्हाला त्यांची भाषणे आजही कानावर पडतात. आज त्यापेक्षा महागाई वाढली आहे. आत्ता जे नेते आमच्यावर टीका करून जनतेत सामाजिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की उपाशीपोटी केलेल्या भाषणाने पोट भरत नाही. महाविकास सरकारने कोरोनाकाळात आणि आत्ताही चांगले काम केले आहे. या कामाच्या पावतीमुळेच पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. भाजपा असो की मनसे या नेत्यांनी महागाईवर बोलावे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या मदतीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. केवळ भाषणबाजी करून आणि पवार कुटुंबावर आरोप करून जनतेचे पोट भरणार नाही. आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादान या विषयावर केलेल्या वक्तव्यावर खासदार सुळे म्हणाल्या, त्यांच्या वाक्याची दखल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आहे. तो विषय ते योग्य पद्धतीने हाताळत आहेत.
शशिकांत शिंदे यांनी संघटन मजबूत करावे
जिह्यातील राजकारणात आमदार शशिकांत शिंदे यांच्यासारख्या आक्रमक नेत्यावर पक्षातूनच राजकीय डाव केले जात आहेत. यावर त्या म्हणाल्या, आमदार शशिकांत शिंदे हे पवार साहेबांचे निष्ठांवत आहेत. जिह्याच्या राजकारणात जे काही होत आहे, त्यावर आमदार शिंदे सक्षमपणे सामोरे जात आहेत. त्यांनी अजुन ताकदीने जिह्यातील संघटना मजबूत करावी. त्यांच्या संघटन कौशल्याची पवार साहेब नक्कीच दखल घेतात.
समाधीस्थळाची पाहणी अन् सूचना
खासदार सुप्रिया सुळे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी परिसराची अगदी बारकाईने पाहणी केली. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱयांना समाधीस्थळावरील परिस्थितीबाबत अनेक सूचना केल्या. कितीही निधी लागो, तुम्ही ज्या आवश्यक गोष्टी आहेत, त्या करायलाच हव्यात, अशी सूचना केली. दरम्यान, बागेत शालेय मुलींनी सुप्रिया सुळे यांच्याशी फोटो व सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. सुळे यांनीही कोणालाही नाराज न करता प्रोटोकॉल बाजूला ठेवत सर्व मुलींशी संवाद साधून फोटो काढून दिले.