ग्रामस्थांची मागणी
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर-अनमोड रस्त्यावर डोंगरगाव गावाला जोडणारा संपर्क रस्ता पूर्णपणे निकामी झाला असून चालत जाणेही कठीण झाले आहे. या रस्त्यासाठी अनुदान मंजूर झाले आहे. मात्र, अद्याप कामाला सुरुवात न झाल्याने गावकऱयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
खानापूर-अनमोड रस्त्यावर दुर्गम भागात वसलेल्या डेंगरगावचा दोन कि. मी. रस्ता पूर्णपणे निकामी झाला असून जागोजागी खड्डे व चिखल झाला आहे. गावकऱयांना खानापूरला येण्यासाठी चिखलातून वाट काढत यावे लागत आहे. गावात विद्यार्थ्यांसाठी दोन वेळा बस येते. रस्ता दुरुस्त न झाल्यास पावसाळय़ात या ठिकाणी चालक बस आणत नाहीत. आताच बसचालक बस डोंगरगावला आणताना तक्रार करत आहेत. त्यासाठी हा रस्ता त्वरित होणे गरजेचे आहे. या रस्त्यासाठी अनुदानही मंजूर झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी या कामाची निविदाही मंजूर होऊन कंत्राटदाराला काम देण्यात आले. मात्र, कंत्राटदाराने या रस्त्याचे काम सुरू केले नसल्याने गावकऱयांतून संताप व्यक्त होत आहे.
येथील विष्णू पाटील ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, आम्ही सतत पाठपुरावा करून जिल्हा पंचायतीकडून हा रस्ता मंजूर करून घेतला. यात खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. शासनाच्या नियमानुसार कंत्राटदाराने कंत्राट मंजूर करून घेतले आहे. मात्र, तीन महिन्यांपासून काम सुरू केले नाही. यामुळे पावसात आम्हाला या रस्त्यावरून चालत जाणेही कठीण होणार आहे. बसचालक गावात बस आणणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. कंत्राटदाराला हे काम करायचेच नसल्यास त्यांनी जिल्हा पंचायतीला कळवून काम दुसऱया ठेकेदाराला द्यावे, असे ते म्हणाले.