पुलाची केबल गंजलेल्या अवस्थेत असल्याने अपघात
मेर्बी / वृत्तसंस्था
महिला आणि लहान मुलांसह 135 बळी घेणाऱया मोर्बी झुलता पूल दुर्घटनेच्या संदर्भात चौकशीचा आदेश देण्यात आला असून या पुलाचे व्यवस्थापन पाहणाऱया ओरेव्हा समूहाच्या 9 कर्मचाऱयांना सोमवारी अटक करण्यात आल्यानंतर तपासाने वेग घेतला आहे. हा अपघात नैसर्गिक असून तो देवाच्या इच्छेने झाला आहे, असा बचाव कंपनीच्या व्यवस्थापकाने तपासाच्या वेळी केल्याचे वृत्त आहे.
कंपनीच्या कर्मचाऱयांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले आहे. त्यांच्या वतीने जामीनाचा अर्ज सादर करण्यात आला आहे. पुलाच्या केबल्स पुन्हा उघडून बदलण्याच्या स्थितीत नव्हत्या. त्या गंजत होत्या. गंजणे ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याने व्यवस्थापन काहीही करु शकत नव्हते. हा अपघात ही परमेश्वराची इच्छा आहे असा बचाव व्यवस्थापक कंपनीच्या वतीने करण्यात आला.
मात्र, कंपनीविरोधात सादर करण्यात आलेल्या तक्रारीनुसार हा अपघात ही परमेश्वरी इच्छा नसून गुन्हेगारी स्वरुपाच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाला. त्यामुळे अपघातासाठी कंपनी जबाबदार आहे. गुन्हा विज्ञान शास्त्रातंर्गत केलेल्या तपासणीनुसार पुलाच्या केबल्स गंजलेल्या स्थितीत होत्या. मात्र त्या न बदलता केवळ फ्लोअरिंग नव्याने करण्यात आले. त्यामुळे गंजलेल्या केबल्सवरील वजन अधिक प्रमाणात वाढले. यामुळे हा झुलता पूल तुटला. केबल्स बदलण्यात आल्या असत्या तर अपघात घडला नसता, अशी भूमिका राज्य सरकारच्या वतीने मांडण्यात आली. अटक केलेल्या कर्मचाऱयांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
वकील संघटनांचा प्रस्ताव
मोर्बी वकील संघटना आणि राजकोट वकील संघटना या दोन्ही संघटनांनी आरोपींचे वकीलपत्र घेण्यास नकार दिला आहे. या संघटनांचे सदस्य असणारे वकील आरोपींची बाजू न्यायालयात मांडणार नाहीत, असा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. या दोन्ही संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाही काढला होता.
अपघातात 135 ठार
गेल्या रविवारी गुजरातमधील मोर्बी शहरात माच्छू नदीवरील ब्रिटीशकालीन झुलता पूल कोसळून झालेल्या अपघातात 125 जणांचा बळी गेला होता. पुलाचे लोखंडी बंध गंजून तुटल्याने पूल कोसळला होता. यावेळी पुलावर मोठय़ा प्रमाणात माणसे जा ये करीत होती. या पुलाचे व्यवस्थापन करणाऱया कंपनीविरोधात गुन्हेगारी तक्रार सादर करण्यात आली असून चौकशीला वेग आला आहे.