प्रतिनिधी/ पणजी
भाजपने विभाजित केलेल्या भारतातील लोकांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला विविध स्तरांतील लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत आहे.
सहा महिन्यांपूर्वी कन्याकुमारी येथून प्रारंभ झालेल्या या यात्रेने आतापर्यंत जम्मूपर्यंतचे सुमारे 3,570 किमीचे अंतर कापले आहे. त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांसह विद्यार्थीवर्गानेही मोठय़ा संख्येने सहभाग घेतला, असा दावा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. तेलंगणातील गोपलापुरम महबूबनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी एआयसीसी मीडिया विभाग अध्यक्ष जयराम रमेश, कॅप्टन उत्तमकुमार रेड्डी, तेलंगणाचे सीएलपी नेते मल्लू भाटी, पंजाबचे काँग्रेस प्रभारी हरीश चौधरी, कर्नाटकचे माजी मंत्री कृष्णा बायरे गौडा आदींची उपस्थिती होती.
भाजप सरकारकडून मिळणाऱया नोकऱयांच्या पोकळ आश्वासनांना कंटाळलेले विद्यार्थी आणि तरूण मोठय़ा संख्येने या यात्रेत सहभागी होत आहेत, या यात्रेतील हा एक महत्त्वपूर्ण बदल आहे, असे ते म्हणाले. शेतकऱयांच्या भूसंपादनाच्या मुद्दय़ावर भट्टा परसौळ येथील निष्पाप शेतकऱयांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राहुल गांधी यांनी 2011 मध्ये सुरू केलेल्या ‘किसान संदेश यात्रे’ची आठवण चोडणकर यांनी यावेळी करून दिली.
आपल्या भारताला फुटीरतावादी शक्तींपासून वाचवण्यासाठी राहुल गांधींनी आता भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. तिला मिळणारा प्रतिसाद आणि पाठिंबा पाहता यावेळीही भारताला एकत्र करण्यात त्यांना यश मिळेल, असा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला.