दसरा क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
जय पराजय न पाहता खिलाडुवृत्ती मनात ठेवून नेहमी सराव करीत जोमाने खेळ खेळले तरच आपण यश संपादन करु शकतो. सध्याच्या तंत्रज्ञान युगात सर्व विद्यार्थ्यांना खेळाची आवश्यकता आहे. मोबाईलमुळे विद्यार्थी व्यायामाकडे व खेळांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांना खेळण्यास प्रवृत्त केले तरच आपण सक्षम बनू शकतो. ऑलिम्पिकमध्ये सध्या भारत पिछाडीवर आहे. ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदके मिळविण्यासाठी प्रयत्न चालले आहेत, त्याला आपणही प्रतिसाद देणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी व्यक्त केले.
युवजन क्रीडा खाते व महिला सबलीकरण आयोजित जिल्हास्तरीय दसरा क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा युवजन क्रीडा अधिकारी जीनेश्वर पडणाड, जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी बी. एस. डीग्रेज आदी उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाध्वजारोहण करण्यात आले. जीनेश्वर पडणाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. राष्ट्रीय खेळाडू तुषार भेकणे, शशांक पाटील, फारुक खान व राजेश यांनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. शांतीचे प्रतीक म्हणून फुगे व कबुतरे हवेत सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू प्रीती अझुरेने सर्व खेळाडूंना शपथ दिली.
या स्पर्धेत बेळगाव जिह्यातील सर्व तालुक्मयातील खेळाडूंनी भाग घेतला आहे.
दोन दिवस चालणाऱया या स्पर्धेत व्हॉलीबॉल, फुटबॉल, थ्रोबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, शटल बॅडमिंटन त्याचप्रमाणे ऍथलेटिक्स खेळांना प्रारंभ झाला आहे. यावेळी बसवराज होसमठ, अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर, व्ही. एस. पाटील, संजीव नाईक, नागराजन्, हणमंत पाटील, जी. एन. पाटील, एच. एस. शिंगाडे, शंकर कोलकार आदी मान्यवर उपस्थित होते.