आई आणि वडिलांची एक एक पेशी घेऊन मातेच्या उदरात बाळ आकाराला येत असते. रक्त आणि रेताच्या मिश्रणाने पाच दिवसांनी बुडबुडय़ासारखे होते. सात दिवसांनी पिशवीसारखे दिसते. पंधरा दिवसात ती पिशवी फुगून मोठी होते. एक महिना झाला की कठीण होते. आणि नंतर अवयव तयार होतात. डोके दोन महिन्यांनी तर पोट तिसऱया महिन्यात आकाराला येते. हातापायांचे अंकुर दिसू लागतात. चौथ्या महिन्यात त्वचा, पाचव्या महिन्यात नखे, तर नऊ छिदे फुटतात ती सहाव्या महिन्यात. पायातून प्राणाचा प्रवेश होतो. तो सर्व ठिकाणी राहतो. सातव्या महिन्यात टाळू फोडून चैतन्य जीवात प्रवेश करते. तेव्हापासून त्याला पूर्व जन्माचे स्मरण होते आणि तो भगवंताची प्रार्थना करतो या गर्भवासरूपी नरकातून मला सोडव. यापुढे तुझे भजन करीन आणि तुला विसरणार नाही. अधोमुख त्रासलेला जीव तेव्हा सेहमचा जप करतो सेहम ही मौनावस्था असते. हे परमेश्वरा फक्त तू आणि तूच. मी देखील तूच. याला अजपाजप असं म्हणतात. नऊ महिने सरताच बाळ जगात येते आणि सेहमची विस्मृती होऊन केहम म्हणत विश्वाच्या पसाऱयात हरवून जाते. श्री दत्त महात्म या ग्रंथामध्ये याचे सविस्तर वर्णन आले आहे.
जिवाचा जन्म हा ऋणानुबंधानेच होत असतो. आईच्या उदरात अंकुर उगवायचा अवकाश की अनेक नाती जीवाला जन्मापूर्वी येऊन चिकटतात. नातवंड, पतवंड, मुलगा, मुलगी अशी कौटुंबिक नाती तर असतातच. शिवाय जात धर्म आणि सामाजिक क्वचित राजकीय वलयदेखील त्याच्याभोवती निर्माण होते. आईच्या पोटात फक्त तू आणि मी हे परमेश्वराशी नाते जोडणारा जीव नंतर ऋणानुबंधाच्या पसाऱयात स्व चा शोध घेणे विसरतो आणि कर्मबंधानुसार पुन्हा पुन्हा जन्माला येत राहतो. स्वामी समर्थ यांच्या चरित्रात एक गोष्ट आहे. एकदा स्वामी श्रीकृष्ण त्रिविक्रम या ठिकाणी नारायण सरोवर स्थळी आले असता तेथील पैसे वसूल करणाऱया गुंडांना धडा शिकवावा आणि शिक्षण द्यावे म्हणून आकाश मार्गाने उडत जाऊन सरोवराच्या मध्यभागी जमिनीवर बसावे तसे मांडी घालून बसले. अन्न पाण्याशिवाय अहोरात्र आनंदात निमग्न असणाऱया स्वामींना बघून गुंडांचे आंतरबाह्य परिवर्तन झाले व ते त्यांचे भक्त झाले परंतु तिथे असणाऱया ग्रंथ पंडिताला मात्र स्वामींच्या या लीलेमुळे मनात संशय निर्माण होऊन वाटले की हे तंत्र मंत्र असावे किंवा एखादे पिशाच्च यांना वश असावे. नुसते कोरडे ज्ञान वाहणाऱया त्या पंडिताला स्वामी म्हणाले, तू न्याय व्याकरण जाणतोस आम्ही भिक्षा मागत फिरतो. आम्हाला तुझ्या इतके ज्ञान नाही. असे म्हणून त्या पंडिताकडे स्वामींनी दीर्घदृष्टी टाकली. त्याबरोबर त्याला स्वामी समर्थांचे दिव्य साक्षात्कारी रूप कळले आणि तो शरण आला. स्वामी त्याला म्हणाले, ‘अरे तुझ्या माता पित्याला बोलाव बरे!’ त्यावर तो म्हणाला, त्यांना स्वर्गवासी होऊन छत्तीस वर्षे झाली स्वामी हसून म्हणाले, ‘खरे की काय?’ मग आत खोलीमध्ये तुझ्या पाळण्यातल्या मुलाला कोण झोके देत आहे? यावर तो बावचळून म्हणाला, ‘स्वामी कृपा करून उलगडा करावा.’ स्वामी म्हणाले,‘ घरात जाऊन बघ, एक मोठा भुजंग तुझ्या बाळाचे रक्षण करत असून पाळण्याला झोके देतो आहे. वासनाक्षय न झाल्यामुळे सर्पकुळात जन्म घेऊन तुझ्या घरी आलेला तुझा तो बाप आहे.’ एवढय़ात तो मोठा भुजंग स्वामी जवळ आला. पंडित आणि जमलेले लोक त्याला कसे मारावे याचा विचार करत होते. ते पाहून तो समर्थांच्या अधिकच जवळ आला. तेव्हा स्वामी त्याला उचलून म्हणाले, ‘आता कशाला घाबरतोस? मनुष्य जन्मात असताना क्रूरपणे वागलास. संसार करायची वासना राहून गेल्याने मुलाच्या दारी आलास. थांब जरा, स्वामींनी त्या सर्पाला उचलले आणि नारायण सरोवरात सोडून दिले. म्हणाले, ‘आता याचा पुढचा जन्म योग्यांच्या कुळात होऊन त्याचा उद्धार होईल.’ सद्गुरू कृपेने मनोजय आणि वासनाक्षय होताच माणसाचा उद्धार होतो आणि तो पुढील गतीला प्राप्त होतो. नाहीतर पुन्हा आप्तांमध्ये जीव अडकून वेगवेगळय़ा योनीत जन्म घेतो व पसाऱयात अडकतो. संत चोखामेळा यांचा एक अभंग आहे. ‘तुटता आयुष्याचा दोरा येर वाउगा पसारा. टाकून पळती रांडा पोरे, अंती होती पाठमोरे. आयुष्यात जगताना सगेसोयरे मित्र मंडळ आणि वस्तू यांचा एवढा पसारा माणूस भोवती मांडून ठेवतो की जीव त्यात अडकून सुटता सुटत नाही.
संवादमाध्यमे मुबलक उपलब्ध नव्हती तेव्हा आयुष्याच्या विविध टप्प्यावर भेटणारी माणसे ऋणानुबंध संपला की जगाच्या कानाकोपऱयात कुठेतरी हरवून जायची. पुन्हा भेट दुर्मिळच. मुली सासरी गेल्या की त्यांच्या मैत्रिणी पुन्हा सापडत नसत. उरत फक्त आठवणी. परंतु काळाने कुस बदलली आणि हातात सतत असणाऱया भ्रमणध्वनीने एकांतवासी लोकांनादेखील शोधून माणसांत आणले नंतर सुरू झाले ते एकत्रित मेळावे. गेट-टुगेदर. बालवर्गापासून कॉलेज संपेपर्यंतचे मित्र मंडळ, निवृत्तीधारकांचे मित्र सोबती, दूर गेलेले नातेवाईक हे सगळे जमवून एकत्र आणायचे आणि त्या त्या वयातल्या आठवणी काढून रमायचे हसायचे, रडायचे. पुन्हा काय तर संपर्कात राहायचे. त्यामुळे काय साध्य होते? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘माणूस एकदा इंद्रियांचा गुलाम झाला की संपले सारे.’ विषयांचा विसरू पडे। इंद्रियांची कसमस मोडे। मनाची घडी घडे हृदयामाजी। हा त्यावर उपाय आहे. विषयांचा भोवती असलेला पसारा मनाला खुणावीत असतो. मन इंद्रियांमधून मागे घ्यायचे. जेव्हा आपण वस्त्र घ्यायला दुकानात जातो तेव्हा ते पसरून दाखवले की छान वाटते. वस्त्राच्या दोन अवस्था असतात. पसरलेले व घडी घातलेले. माऊली म्हणतात, मन साऱया देहावर पसरलेले आहे त्याची घडी हृदयात होते पण केव्हा? मन एकाग्र करून सद्गुरूंचे स्मरण केले की मनाच्या पटावर असलेला असता व्यस्त प्रपंच नाहीसा होतो. त्याचे विस्मरण होते. इंद्रियांची कसमस म्हणजे अस्वस्थता मोडते. मनात एकाग्रतेमुळे ज्ञानाचे स्मरण होते. आजुबाजुला असलेल्या प्रपंचाच्या पसाऱयामुळे तो भगवंत न भेटता देवळात उत्सवाच्या वेळी असलेल्या जत्रेसारखी माणसाच्या मनाची अवस्था होते. गाभाऱयातल्या देवाचे दर्शन काही होत नाही. माणूस जत्रेमधले खेळ, खाणे, पिणे आणि तमाशा यात हरवून जातो. सध्या समाजात दिसते की संवाद माध्यमांना हाताशी धरून माणूस लोकप्रिय होण्यासाठी धडपड करतो.
माऊली ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात अज्ञानी लोकांची लक्षणे सांगताना म्हणतात, ‘तरी संभावने जिये। जो मानाची वाट पाहे। सत्कारे होय तोषु जया।’ प्रति÷sसाठी जगणारा, मानाची वाट बघणारा, सत्काराने संतोषी होणारा, हा अज्ञानी आहे. ‘घाली विद्येचा पसारा’ असा माणूस हा पुण्यकर्माची दवंडी पिटवून जेवढे म्हणून काही करतो तेवढय़ाचा मोर्चा कीर्तीकडेच असतो. सातशे पंचवीस वर्षांपूर्वी माऊली आपल्याला सांगून गेले. जीवश्च कंठश्च भ्रमणध्वनीने मोठा पसारा घालून खरोखर आपल्याला अज्ञानी करून ठेवले. आत्मशोधाची तळमळ दूर करणारे हे माध्यम खरेच का प्राणाइतके महत्त्वाचे आहे? यावर चिंतन मनन घडायलाच हवे. -स्नेहा शिनखेडे