सुरक्षित मार्गाचा शोध, जनक्षोभात आणखी वाढ, लवकरच निवडणूक होण्याची शक्यता
कोलंबो / वृत्तसंस्था
प्रचंड जनक्षोभाला तोंड देत असलेले श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आता देश सोडून पलायन करण्याच्या तयारीत आहेत, असे वृत्त आहे. त्यांनी रीतसर विमानाने देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, विमानतळावरील कर्मचारी वर्गाने तो हाणून पाडला. आता ते गुपचुप पलायनाच्या तयारीला लागले आहेत. त्यासाठी सागरी मार्ग किंवा फारशा उपयोगात नसलेल्या विमानतळाचा उपयोग करण्याचा त्यांचा विचार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विदेशी कर्जाच्या सापळय़ात अडकलेला श्रीलंका हा देश सध्या अभूतपूर्व अन्नटंचाई आणि इंधनकमतरतेमुळे मेटाकुटीला आला आहे. सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात लोक रस्त्यावर उतरले असून हजारो संतप्त आंदोलकांनी गोटाबाया राजपक्षे यांच्या राजवाडा सदृष घराचाच ताबा घेतला आहे. अध्यक्षांनी तेथून काढता पाय घेतला असून ते नेमके कोठे आहेत, याची माहिती प्रशासनाने दिलेली नाही. राजपक्षेंसह पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनीही पदत्याग केल्याने या देशाची अवस्था निर्नायकी झाली असल्याचे दिसून येत आहे.
शनिवारपासून अज्ञातवासात
अध्यक्ष राजपक्षे गेल्या शनिवारपासून कोणालाही दिसलेले नाहीत. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी भाग घेतलेला नाही. त्यांनी रविवारी कोलंबोच्या विमानतळावरुन विमानाने विदेशी जाण्याचा प्रयत्न केला. तथापि, विमानतळावरील कार्मचाऱयांनी त्यांना तसे करु दिले नाही. परिणामी, त्यांना विमानतळावरुन परतावे लागले. आता त्यांनी अन्य मार्गांचा शोध सुरु केला आहे.
बंधूंनाही रोखले
गोटाबाया राजपक्षे यांचे बंधू बासिल राजपक्षे (माजी अर्थमंत्री) यांनीही महनीय व्यक्तींसाठी असलेल्या प्रवेशद्वारातून कोलंबोच्या विमानतळात प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, तेथील कर्मचाऱयांच्या जागरुकतेने तो असफल ठरला. त्यामुळे राजपक्षे यांचे, त्यांच्यासह पूर्वी सत्तेत असलेले सर्व नातेवाईक देशातच आहेत, हे स्पष्ट झाले आहे. स्वतः माजी अध्यक्षांनीही आपण कोठेही गेलेलो नाही असे आपल्या संदेशात स्पष्ट केले आहे. काही नातेवाईकांकडे अमेरिकेचा पासपोर्ट असूनही त्यांना देश सोडून जाण्यात यश आलेले नाही.
जनक्षोभात वाढ
श्रीलंकेतील जनक्षोभात दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशाच्या प्रत्येक भागांमध्ये लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहेत. असहय़ महागाई, इंधनाची टंचाई आणि अन्नधान्यांची कमतरता यामुळे सर्वसामान्यांना जिवंत राहणेही कठीण झाल्याची भावना आहे. त्यामुळे राजपक्षे कुटुंबाला सत्तेतून घालविण्यासाठी लोकांनीच पुढाकार घेतला आहे, असे अनेक विदेशी पत्रकारांनी स्पष्ट केले आहे.
भारत युरिया पुरविणार
श्रीलंकेत निसर्ग शेतीचा प्रयोग फसला आहे. संपूर्ण देशात रासायनिक खतांच्या उपयोगावर दोन वर्षांपूर्वी बंदी आणण्यात आली होती. परिणामी, या देशाचे अन्नधान्य उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटल्याने लोकांची अन्नान्न दशा झाली. त्यातच पेट्रोल, डिझेल आणि वीज यांचीही मोठय़ा प्रमाणात कमतरता निर्माण झाली आहे. आता या देशाची कृषी व्यवस्था सावरण्यासाठी भारताने पुढाकार घेतला असून भारत श्रीलंकेला युरिया पुरविणार आहे. यापूर्वी भारताने तांदूळ, दुधाची भुकटी, औषधे आणि इतर साधनसामग्री पुरविलेली आहे.