वृत्तसंस्था/ सेरब्रुकेन (जर्मनी)
येथे सुरु असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2022 च्या हायलो खुल्या सुपर 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा किदांबी श्रीकांत तसेच ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे आव्हान उपांत्य फेरीतच समाप्त झाल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
2021 साली विश्व चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत कास्यपदक मिळवणाऱया किदांबी श्रीकांतला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या गिनटींगकडून पराभव पत्करावा लागला. इंडोनेशियाच्या सहाव्या मानांकित ऍन्थोनी गिनटीगने श्रीकांतचा 21-18, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. हा सामना 38 मिनिटे चालला होता.
महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात थायलंडच्या बी. एमसार्द आणि एन. एमसार्द या भगिनींनी भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा 17-21, 21-14, 21-18 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. हा उपांत्य फेरीचा सामना 70 मिनिटे चालला होता. आता भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.