आप, केसीआर, आझाद यांना वगळले
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी 21 समविचारी राजकीय पक्षांच्या (Like Minded) प्रमुखांना पत्र लिहून 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) समारोप सोहळ्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. या समविचारी पक्षांच्या उपस्थितीमुळे भारत जोडो यात्रेचा “सत्य, करुणा आणि अहिंसा” हा संदेश बळकट होणार असल्याचे असे खरगे यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसने काढलेल्या समविचारी पक्षाच्या यादीमध्ये आम आदमी पार्टी (AAP), तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR ) यांची भारत राष्ट्र समिती (BRS) आणि गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (DPAP) यांना वगळले आहे.
राहुल गांधींनी भाजप विरोधी पक्षांशी संपर्क साधून भाजपला “पर्याय” देण्यासाठी आपण एकत्र आले पाहीजे असे आवाहन केले होते. त्यानंतर हे निमंत्रण अनेक पक्षांना देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधून कॉंग्रेसच्या भारत जोडोचा प्रवास सुरू झाल्यावर राहूल गांधींनी उत्तर प्रदेशातील राजकीय नेत्यांसह अनेक प्रमुख व्यक्तींना पत्रे लिहून त्यांच्या यात्रेत सामील होण्याचे आवाहन केले होते.