पुणे / प्रतिनिधी :
दहावी, बारावी परीक्षेची पेपर तपासणी जवळपास पूर्ण झाली असून, परीक्षेचा निकाल लवकरच लागणार असल्याचे संकेत मंगळवारी बोर्डाकडून देण्यात आले. त्यानुसार दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत, तर बारावीचा निकाल 10 जूनला लागणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली.
दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर केले जातात. यंदा दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होताच राज्यातील शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. तसेच कायम विनाअनुदानित शाळा संघटनेच्या असंख्य प्रतिनिधींनी दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे न तपासता ते परत केले होते. यामुळे या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात हाती. मात्र, राज्य शिक्षण मंडळाने नियोजन केल्याने या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीचे काम सुरूळीत सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर निकाल लवकर लावण्याचे संकेत देण्यात आले आहेत.