ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board Of Secondary & Higher Secondary Education) आज दहावीचा निकाल (SSC Result) जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. यात यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. यावर्षी ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ९६.०६ टक्के इतके आहे. अर्थात परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा १.०९ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ही एक आनंदाची बातमी असताना दुसरीकडे निकालांनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील २९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. त्यामुळे २९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागणे ही चिंतेची बाब आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये २२,९२१ शाळांपैकी १२,२१० शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. २२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर २९ शाळांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. एकीकडे १२ हजाराहून अधिक शाळांचा निकाल हा १०० टक्के लागणं आणि दुसरीकडे २९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागणं ही शिक्षण यंत्रणेला विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
राज्यात २९ शाळांचा निकाल शून्य टक्के असणं ही फारच चिंतेची बाब आहे. शून्य टक्के निकाल म्हणजे इतक्या सगळ्या शाळांमध्ये एकही विद्यार्थी उत्तीर्ण न होणे. या निकालाने विद्यार्थ्यांचं नुकसान झालंच पण या सगळ्याला जबाबदार कोण? कोरोना महामारी? त्या २९ शाळा? शिक्षक? पालक कि स्वतः विद्यार्थी? हे सर्व प्रश्न विचार करायला लावणारे आहेत. निकाल चांगला लागला या नावाखाली शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ही दुर्लक्षित करण्यासारखी नाही कारण तो आकडा मोठा आहे. आता २९ शाळा नेमक्या कोणत्या आहेत? कोणत्या विभागातील आहे? या शाळेतून दहावीला किती विद्यार्थी बसलेले होते? याची कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही मात्र ही बाब गांभीर्याने घ्यायची गरज आहे.
राज्यातील २९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. बोर्डाकडून या शाळांची माहिती जाहीर करण्यात आली नाही. दरम्यान गाव खेड्यात असणाऱ्या अनेक शाळांची पटसंख्या कमी असते. त्यात दहावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असते. तसेच काही शाळांमध्ये विद्यार्थी परीक्षेला बसत नाही. आणि परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी एखाद्या विषयाचा पेपर न दिलेल्यांची संख्या देखील जास्त असते. त्यामुळे शाळांचा निकाल शून्य टक्के लागण्याची शक्यता असे सांगितले जाते.