ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये 22,921 शाळांपैकी 12,210 शाळांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. तर 29 शाळांमध्ये शून्य टक्के निकाल लागला आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी 15 लाख 21 हजार 003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 96.94 असून, यंदाही कोकण विभागानेच बाजी मारली. कोकण विभागाचा सर्वाधिक 97.27 टक्के तर सर्वात कमी 95.90 टक्के निकाल नाशिक विभागाचा लागला आहे.
तसेच यंदा 68 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी 24 विषयांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.