ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. एसटी विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. पण आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने पुन्हा एकदा विनंती केली आहे. ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा, कोणाचीही नोकरी जाणार नाही. कामावर रुजू झाल्यानंतर इतर मागण्यांवर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारवतीने परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. ‘३१ मार्चपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हा. जे येणार नाहीत, त्याच्याबद्दल कठोर भूमिका घेतली जाईल आणि त्यानंतर वेगळी संधी मिळणार नाही,’ असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी सभागृहात काल याबाबत माहिती दिली. कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याबाबत चर्चा करण्याची ग्वाही अनिल परब यांनी दिली. वर्षाला 750 कोटींचा बोजा सरकारवर पडणार आहे. कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत दिले जाणार असून त्याची जबाबादारी राज्य सरकारने घेतली आहे.
त्यामुळे ३१ मार्चपर्यंत कर्मचारी कामावर आले नाहीत तर त्यांच्याबाबत कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.